

बाजारातून आणलेल्या भाज्या ताज्या राहाव्यात म्हणून आपण त्या थेट फ्रिजमध्ये ठेवतो. पण अनेक घरांमध्ये भाज्या प्लास्टिकच्या पिशवीतच ठेवण्याची सवय असते. ही पद्धत सोयीची वाटली तरी ती आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. चुकीच्या साठवणुकीमुळे भाज्या लवकर सडतात, त्यातील पोषक घटक कमी होतात आणि त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो.
लहानसहान गोष्टींकडे लक्ष दिलं, तर रोजच्या आहारात होणारा संभाव्य धोका टाळता येऊ शकतो. प्लास्टिक पिशवीत भाज्या ठेवण्याचे नेमके दुष्परिणाम काय आहेत, ते जाणून घेऊया.
हवा न मिळाल्याने वाढतात जंतू
प्लास्टिक पिशवीमुळे भाज्यांभोवती हवा खेळती राहत नाही. भाज्यांना ताजं राहण्यासाठी हवेशीर वातावरण आवश्यक असतं. पिशवीत ओलावा साचल्याने बॅक्टेरिया आणि बुरशी वाढण्याची शक्यता वाढते. अशा भाज्या खाल्ल्यास पोटदुखी, जुलाब किंवा संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो.
प्लास्टिकमधील रसायनांचा धोका
कमी दर्जाच्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये बिस्फेनॉल-ए (BPA) आणि थॅलेट्ससारखी घातक रसायनं असू शकतात. थंड तापमानातही या रसायनांचा अंश भाज्यांमध्ये मिसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. दीर्घकाळ अशा भाज्या सेवन केल्यास पचनाच्या तक्रारी, हार्मोनल असंतुलन आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
चव आणि पोषणमूल्यांवर परिणाम
प्लास्टिकमध्ये साठवलेल्या भाज्यांचा नैसर्गिक ताजेपणा कमी होतो. विशेषतः पालेभाज्या लवकर मऊ पडतात. त्यातील जीवनसत्त्वे आणि आवश्यक पोषक घटक कमी होतात. त्यामुळे आपण भाज्या खातो, पण अपेक्षित पोषण मिळत नाही.
भाज्या योग्य पद्धतीने कशा साठवाव्यात?
✔ भाज्या प्लास्टिक पिशवीतून काढून काही वेळ हवेत ठेवा
✔ जाळीदार पिशवी किंवा प्लेटचा वापर करा
✔ पालेभाज्या पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवा
✔ फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी भाज्या पूर्णपणे कोरड्या आहेत याची खात्री करा
✔ ओलसर भाज्या थेट फ्रिजमध्ये ठेवू नका
फ्रिजमध्ये काय ठेवतो यापेक्षा ते कशा पद्धतीने ठेवतो हे अधिक महत्त्वाचं आहे. थोडीशी जागरूकता आणि योग्य साठवणूक पद्धत अवलंबली, तर भाज्यांचा ताजेपणा टिकेल आणि आरोग्यही सुरक्षित राहील.