

शरीर निरोगी ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक मानले जाते. मात्र, अनेकजण फक्त दिवसभरात किती पाणी प्यायले यावर लक्ष केंद्रित करतात, तर पाणी पिण्याची योग्य वेळ दुर्लक्षित राहते. जेवताना पाणी पिणे, एकाच वेळी खूप पाणी पिणे किंवा तहान लागल्यावरच पाणी पिणे अशा सवयी अनेकांमध्ये दिसून येतात. आयुर्वेदिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आयुर्वेदात पाणी पिण्याबाबत काही विशिष्ट नियम सांगितले आहेत. हे नियम केवळ पाण्याचे प्रमाण नव्हे, तर ते कधी आणि कसे प्यावे, यावरही भर देतात.
हायड्रेशन म्हणजे फक्त पाणी पिणे नव्हे
तज्ज्ञांच्या मते, शरीराचा मोठा भाग पाण्याने बनलेला असल्याने योग्य प्रकारे हायड्रेट राहणे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे केवळ दिवसभर पुरेसे पाणी पिण्यापेक्षा योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरू शकते.
दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करा
आरोग्यतज्ज्ञ सकाळी उठल्यानंतर सुमारे २०० मिली कोमट पाणी पिण्याचा सल्ला देतात. त्यांच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी थंड पाणी पिल्यास पचनशक्ती म्हणजेच अग्नी मंदावू शकतो. चयापचय प्रक्रियेला चालना मिळण्यासाठी कोमट पाण्यात आले, सैंधव मीठ आणि चिमूटभर दालचिनी घालून पिण्याचाही त्या सल्ला देतात.
अंघोळीपूर्वी एक ग्लास पाणी प्या
आयुर्वेदानुसार अंघोळीपूर्वी एक ग्लास पाणी पिण्याची सवयही फायदेशीर मानली जाते. तज्ज्ञांच्या मते, यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होऊ शकते आणि काही वेळा अचानक चक्कर येण्याचा धोका कमी होऊ शकतो.
जेवताना पाणी पिणे टाळा
जेवण सुरू करण्याच्या सुमारे ३० मिनिटे आधी एक ग्लास पाणी पिणे आणि जेवण झाल्यानंतर एक तासाने पुन्हा पाणी पिणे अधिक योग्य ठरते. जेवताना पाणी प्यायल्यास पचनासाठी आवश्यक एन्झाइम्सची कार्यक्षमता कमी होऊ शकते आणि पोट फुगणे किंवा अपचनाचा त्रास होण्याची शक्यता वाढू शकते.
दिवसभर थोडे-थोडे पाणी प्या
एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पाणी पिण्याऐवजी दिवसभर थोड्या-थोड्या प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला त्या देतात. त्यांच्या मते, दुपारी ४ वाजेपर्यंत सुमारे १.५ लिटर पाणी पिणे आणि सूर्यास्तापूर्वी आणखी अर्धा लिटर पाणी घेणे योग्य ठरते. सूर्यास्तानंतर तहान लागल्यास केवळ घोटभर पाणी पिणे अधिक चांगले असल्याचे त्या सांगतात.
झोपण्यापूर्वी किती पाणी प्यावे?
तज्ज्ञांच्या मते, झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिणे टाळावे. रात्री झोपण्यापूर्वी अर्धा ग्लास पाणी पुरेसे असल्याचे त्या सांगतात.
तज्ज्ञांचे मत
हायड्रेशन म्हणजे फक्त दिवसभर भरपूर पाणी पिणे नव्हे, तर योग्य वेळी पाणी पिण्याची सवय लावणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करणे, जेवताना पाणी टाळणे, दिवसभर घोटाघोटाने पाणी पिणे आणि रात्री मर्यादित प्रमाणात पाणी घेणे, या आयुर्वेदातील सवयी आरोग्यदायी जीवनशैलीसाठी उपयुक्त ठरू शकतात.