

उन्हाळ्यांत घराघरांत मातीच्या माठाचा वापर वाढतो. माठातलं नैसर्गिकरीत्या थंड झालेलं पाणी शरीराला आराम देतं आणि त्याची चवही वेगळी वाटते. फ्रिजच्या अतिथंड पाण्यापेक्षा माठातील पाणी अनेकजण अधिक आरोग्यदायी मानतात. मात्र, माठात पाणी साठवताना त्याची स्वच्छता आणि वेळेवर बदलणं तितकंच महत्त्वाचं असतं.
अनेकदा माठात एकदा पाणी भरलं की ते पूर्ण संपेपर्यंत बदललं जात नाही. यामुळे पाण्याचा ताजेपणा कमी होऊ शकतो आणि माठाच्या आतील भागात जंतू किंवा चिकट थर तयार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात माठातील पाणी किती वेळाने बदलावं आणि माठ स्वच्छ ठेवण्याची योग्य पद्धत काय, हे जाणून घेणं आवश्यक आहे.
माठातील पाणी किती वेळाने बदलावं?
आरोग्याच्या दृष्टीने माठातील पाणी साधारण १२ ते १८ तासांच्या आत बदलणं योग्य मानलं जातं. दिवसातून किमान एकदा तरी माठ रिकामा करून ताजं पाणी भरल्यास पाणी स्वच्छ आणि ताजं राहण्यास मदत होते.
जुनं पाणी जास्त वेळ ठेवल्यास काय होऊ शकतं?
माठ सच्छिद्र असल्यामुळे त्यात हवा खेळती राहते. पण पाणी जास्त काळ साचून राहिल्यास आतील भागावर चिकट थर जमा होऊ शकतो. यामुळे सूक्ष्म जंतू वाढण्याची शक्यता असते आणि पाण्याची चवही बदलू शकते.
माठ स्वच्छ करण्याची योग्य पद्धत
माठातील उरलेलं जुनं पाणी पूर्ण रिकामं करा
स्वच्छ पाण्याने आतील भाग धुवा
हाताने किंवा मऊ ब्रशने हलकं घासून स्वच्छ करा
गरज असल्यास थोडासा बेकिंग सोडा वापरू शकता
धुतल्यानंतर माठ काही वेळ हवेत किंवा उन्हात वाळू द्या
पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी
माठावर नेहमी झाकण ठेवावं
पाणी काढताना हात थेट आत घालू नये
लांब दांड्याची पळी किंवा स्वच्छ ग्लास वापरावा
दररोज ताजं पाणी भरण्याची सवय ठेवावी
माठातील पाणी आरोग्यासाठी चांगलं, पण काळजीही तितकीच गरजेची
माठातील पाणी नैसर्गिक थंडावा देतं आणि उन्हाळ्यात शरीराला आराम मिळवून देतं. मात्र स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास त्याच पाण्याचा आरोग्यावर उलट परिणाम होऊ शकतो.
उन्हाळ्यात माठ वापरत असाल, तर पाणी वेळेवर बदलणं आणि माठ नियमित स्वच्छ ठेवणं ही छोटी पण महत्त्वाची सवय नक्की लावा.
(Disclaimer : या लेखातील माहिती ही सामान्य माहिती व घरगुती उपायांवर आधारित आहे. ‘नवशक्ति’ या उपायांच्या परिणामकारकतेची हमी देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)