आजकाल हेल्दी कुकिंगकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे. नॉन-स्टिक भांड्यांऐवजी पुन्हा पारंपरिक लोखंडी कढई, पितळी आणि मातीच्या भांड्यांचा वापर वाढू लागला आहे. लोखंडी कढईत बनवलेला स्वयंपाक चविष्ट तर लागतोच, पण शरीराला नैसर्गिक आयर्नही मिळते. मात्र प्रत्येक पदार्थ लोखंडी कढईत बनवणे योग्य नसते. काही भाज्या यात उत्तम बनतात, तर काही पदार्थांमुळे अन्नाची चव आणि रंग दोन्ही बदलू शकतात. त्यामुळे लोखंडी कढई वापरताना काही सोपे नियम लक्षात ठेवणे महत्त्वाचे ठरते.
लोखंडी कढईत कोणत्या भाज्या बनवाव्यात?
लोखंडी कढईत काही भाज्या केल्यास त्यांची चव अधिक खुलते आणि अन्नातून आयर्नचे प्रमाणही वाढते. विशेषतः कोरड्या किंवा परतून बनवल्या जाणाऱ्या भाज्या यात चांगल्या बनतात.
पालक, मेथी, चाकवत यांसारख्या पालेभाज्या
भेंडी, पडवळ यांसारख्या परतून बनवायच्या भाज्या
वांग्याचे भरीत किंवा वांगी परतून केलेले पदार्थ
बटाटा, भाजीचे कोरडे प्रकार
अशा भाज्या लोखंडी कढईत केल्यास त्यांची चव वेगळी आणि अधिक रुचकर लागते.
'हे' पदार्थ लोखंडी कढईत टाळा
काही पदार्थ मात्र लोखंडी कढईत बनवणे योग्य मानले जात नाही. विशेषतः जास्त आंबट किंवा दह्याचे पदार्थ यामुळे कढईशी प्रतिक्रिया होऊ शकते.
टोमॅटो जास्त असलेली ग्रेवी
चिंच किंवा जास्त लिंबू असलेले पदार्थ
कढी किंवा दही घालून बनवलेले पदार्थ
अशा पदार्थांमुळे अन्नाचा रंग गडद होऊ शकतो आणि चवही बदलू शकते.
लोखंडी कढईचे फायदे
पारंपरिक लोखंडी कढईत स्वयंपाक केल्यास काही महत्त्वाचे फायदे मिळतात.
अन्नातून नैसर्गिक आयर्न शरीराला मिळते
भाज्या अधिक कुरकुरीत आणि चविष्ट होतात
नॉन-स्टिकच्या तुलनेत रसायनमुक्त स्वयंपाक शक्य होतो
म्हणूनच आजही अनेक घरांमध्ये लोखंडी कढईला खास स्थान आहे. योग्य पदार्थांसाठी तिचा वापर केल्यास स्वयंपाक अधिक पौष्टिक आणि चवदार होऊ शकतो.