
दिवाळीच्या पाच दिवसांच्या सणांपैकी नरक चतुर्दशी हा अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी ‘यमदीपदान’ करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते, की या दिवशी दिवा लावल्याने अकाली मृत्यूची भीती दूर होते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. त्यामुळे ही नकरात्मकता दूर करण्यासाठी चला जाणून घेऊया यंदाच्या नरक चतुर्दशीची तारीख, शुभ मुहूर्त आणि दिवा लावताना कोणते नियम पाळावेत?
हिंदू पंचांगानुसार, नरक चतुर्दशी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला येते. यंदा ही तिथी रविवार, १९ ऑक्टोबर दुपारी १.५१ वाजता सुरू होऊन सोमवार, २० ऑक्टोबर दुपारी ३.४४ वाजता समाप्त होणार आहे. त्यामुळे हा सण सोमवार, २० ऑक्टोबर २०२५ रोजी साजरा केला जाईल.
पौराणिक कथेनुसार, याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने राक्षस नरकासुराचा वध केला होता. त्यामुळे या दिवसाला ‘नरक चतुर्दशी’ असे नाव पडले आहे.
या दिवशी यमराजाच्या पूजेसाठी दिवा लावण्याची परंपरा आहे. याला ‘यमदीपदान’ म्हणतात. यमदीप लावल्याने मृत्यूची भीती दूर होते आणि घरात सुख-समृद्धी, आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते.
१. चार बाजू असलेला दिवा:
हा दिवा चारही दिशांना प्रकाश देईल असा असावा. त्यात चार वाती असाव्यात. चारही वाती चार दिशांच्या प्रतीक आहेत आणि त्यातून प्रसन्नता, शांतता आणि आरोग्य लाभते असे मानले जाते.
२. दक्षिण दिशेला दिवा लावा:
दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते. म्हणूनच दिवा नेहमी घराच्या दक्षिण दिशेला ठेवावा. शक्यतो हा दिवा मातीचा किंवा पिठाचा असावा आणि त्यात मोहरीचं तेल वापरावं. इतर कोणतंही तेल वापरणं टाळावं.
३. चौदा दिव्यांची परंपरा:
या दिवशी १४ दिवे लावण्याची प्रथा आहे. हे दिवे देवघर, तुळशीचे कुंड, पिण्याच्या पाण्याजवळ, स्वयंपाकघर, गच्ची आणि घराच्या मुख्य दरवाज्याजवळ ठेवावेत. या ठिकाणी दिवे लावल्याने घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि सकारात्मकता वाढते.
४. दिवा घरभर फिरवा:
दिवा लावल्यानंतर सर्वप्रथम तो घरभर फिरवावा आणि नंतर घराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून ठेवावा. यावेळी परिसर स्वच्छ आणि शुद्ध ठेवावा. दिवा संध्याकाळी लावणे अत्यंत शुभ मानले जाते.
अनेक लोक धनत्रयोदशीच्या दिवशीही यमदीपदान करतात. यंदा धनत्रयोदशी १८ ऑक्टोबरच्या संध्याकाळी आहे. त्यामुळे इच्छेनुसार त्या दिवशीही दिवा प्रज्वलित करता येईल.
नरक चतुर्दशी हा फक्त दिवा लावण्याचा सण नसून तो अंधकारावर प्रकाशाचा विजय साजरा करण्याचा दिवस आहे. योग्य दिशेला, योग्य प्रकारे दिवा लावल्यास आयुष्यात सकारात्मक ऊर्जा, आरोग्य आणि समृद्धी नांदते, असे मानले जाते.