

उन्हाळा वाढू लागला की शरीरावर उष्णतेचा परिणाम जाणवू लागतो. जास्त घाम येणे, थकवा, डिहायड्रेशन किंवा पोटाच्या तक्रारी यांसारख्या समस्या या काळात अनेकांना जाणवतात. त्यामुळे या दिवसांत आहार आणि दैनंदिन सवयींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा आणि पचनक्रिया सुरळीत राहावी यासाठी काही सोप्या पण उपयुक्त टिप्स सुचवल्या आहेत.
नारळ पाणी आणि सब्जा
उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नारळ पाणी अत्यंत फायदेशीर मानले जाते. आठवड्यातून काही वेळा नारळ पाणी पिण्याची सवय लावल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. त्यात चिमूटभर भिजवलेला सब्जा घातल्यास शरीराला अतिरिक्त थंडावा मिळतो. नारळ पाण्यात असलेले इलेक्ट्रोलाइट्स आणि पोटॅशियम शरीराला ऊर्जा देतात तसेच पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.
दुपारच्या जेवणात ताक किंवा दही
उन्हाळ्यातील आहारात दही किंवा ताकाचा समावेश करणे उपयुक्त मानले जाते. दुपारच्या जेवणासोबत ताक किंवा दही घेतल्यास शरीराला थंडावा मिळतो आणि पचन सुरळीत राहते. ताक पिताना त्यात थोडे भाजलेले जिरे घातल्यास चव वाढते तसेच पचनासाठीही ते फायदेशीर ठरते.
संध्याकाळी किंवा रात्री केळी खाणे
केळी हे पोटासाठी हलके आणि पौष्टिक फळ मानले जाते. संध्याकाळी किंवा रात्रीच्या जेवणानंतर एक केळ खाल्ल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. केळीत असलेले इलेक्ट्रोलाइट्स शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवतात आणि पोट साफ राहण्यास मदत करतात.
महिलांसाठी विशेष काळजी
उन्हाळ्यात महिलांनी आहार आणि आरोग्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषतः प्रिमेनोपॉज किंवा मेनोपॉजच्या काळात हार्मोनल बदलांमुळे पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सहज पचणारे आणि पौष्टिक अन्नपदार्थ आहारात समाविष्ट करणे आवश्यक आहे. शरीरातील बदलांकडे लक्ष देत डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य काळजी घेतल्यास उन्हाळ्याचा त्रास कमी होऊ शकतो.