

मुंबई : राज्यातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रकियेचे वेळापत्रक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील इयत्ता ११वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेकरिता विद्यार्थ्यांना १० एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून प्रवेश अर्जाचा भाग १ भरून नोंदणी करता येणार आहे. तर प्रवेश अर्जाचा भाग-२ भरण्याची सुविधा राज्य मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
गतवर्षीपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. प्रवेश प्रकियेत २०२५-२६ मध्ये अनेक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे यंदा प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी राज्य मंडळाने अकरावी प्रवेश प्रक्रियेची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी अर्जाचा भाग-१ भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १० एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर अर्जाचा पहिला भाग भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रवेश अर्जाचा भाग-२ भरण्याची सुविधा राज्य मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.