

मुंबई : राज्यातील सध्याची पावसाची परिस्थिती ही अभूतपूर्व असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. ६) सांगितले. एका दिवसात राज्यात सुमारे ३५० झाडे कोसळली, तर वर्षभरात सरासरी ८०० झाडे कोसळतात, असे त्यांनी नमूद केले. मंगळवार दुपारनंतर वाऱ्याचा वेग ताशी ७० ते ९० किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता असून, पावसाचाही जोर वाढेल, असा इशाराही त्यांनी दिला.
समुद्रकिनारे आणि धबधब्यांपासून दूर राहा
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेषतः तरुणांना समुद्रकिनारे, धबधबे आणि पावसाळी पर्यटनस्थळांवर जाणे टाळण्याचे आवाहन केले. खराब हवामानामुळे कोणताही धोका पत्करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
विधिमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब
मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाच्या गंभीर इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सदस्य, अधिकारी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य विधिमंडळाचे कामकाज सोमवारी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज
सरकार परिस्थिती हाताळण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील सर्व आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात करण्यात आली असून, आवश्यक त्या ठिकाणी मदतकार्य सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
मंगळवारी परिस्थितीचा पुन्हा आढावा
मंगळवारी दुपारी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात येणार असून, प्रत्यक्ष परिस्थितीनुसार पुढील निर्णय आणि आवश्यक निर्देश दिले जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मानखुर्द दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
मानखुर्द येथे चाळ कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर बोलताना, संबंधित बांधकाम बेकायदा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच मृत व्यक्ती शेजारील झोपडपट्टी परिसरातील रहिवासी असल्याची माहिती त्यांनी दिली.
विरोधकांची सरकारकडे मागणी
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मदत आणि बचावकार्य प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व सदस्यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. दुसरीकडे, राज्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या तयारीचा आणि मदतकार्याचा सविस्तर अहवाल सभागृहात सादर करण्याची मागणी विरोधकांनी केली.