

भारतीय संगीतसृष्टीतील दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले यांचे रविवारी (दि. १२) वयाच्या ९२व्या वर्षी मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण संगीतविश्वात शोककळा पसरली असून, देश-विदेशातील चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास
कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना शनिवारी (दि.११) ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयातील डॉ. प्रतीत समदानी यांनी त्यांच्या निधनाचे कारण मल्टिपल ऑर्गन फेल्युअर असल्याचे सांगितले. त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती मुलगा आनंद भोसले यांनी दिली.
अचानक प्रकृती बिघडली
निधनाच्या काही तासांपूर्वीच त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची नात जनाई भोसले हिने सोशल मीडियावर त्या उपचार घेत असल्याचे सांगत गोपनीयता राखण्याची विनंती केली होती.
उद्या होणार अंत्यसंस्कार
"उद्या सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत लोअर परळ येथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत," अशी माहिती आनंद भोसले यांनी दिली.
सात दशकांहून अधिक कारकीर्द
आशा भोसले या भारतीय संगीतसृष्टीतील प्रभावशाली आणि बहुआयामी आवाजांपैकी एक मानल्या जातात. सात दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी हिंदीसह अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये हजारो गाणी रेकॉर्ड केली. त्यांच्या आवाजाने हिंदी चित्रपटसंगीताला नवी ओळख दिली.
अजरामर गाणी आजही लोकप्रिय
त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली. "पिया तू अब तो आजा" (कारवाँ), "दम मारो दम" (हरे रामा हरे कृष्णा), "ये मेरा दिल" (डॉन), "इन आँखों की मस्ती" (उमराव जान) आणि "मेरा कुछ सामान" (इजाजत) यांसारखी गाणी आजही सर्व पिढ्यांमध्ये तितकीच लोकप्रिय आहेत.
आशा भोसले यांची मराठी चित्रपटांतील गाणी अत्यंत लोकप्रिय आहेत. यात "गोमू संगतीनं", "जांभूळ पिकल्या झाडाखाली", "रूपेरी वाळूत", "या रावजी बसा भाऊजी", "मनमोहना तू राजा स्वप्नातला", "मेंदीच्या पानावर" आणि "दिस जातील दिस येतील" यांसारख्या सदाबहार गाण्यांचा समावेश आहे.
अनेक पुरस्कारांनी सन्मान
भारतीय चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यामध्ये प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराचाही समावेश आहे. त्यांच्या कारकिर्दीने भारतीय संगीताचा एक सुवर्णकाळ घडवला.
सर्व स्तरातून श्रद्धांजली अर्पण
त्यांच्या निधनानंतर राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील मान्यवर आणि चाहत्यांकडून सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. त्यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वातील एक युग संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.