मुंबईतील मालाड (पूर्व) येथील कुरार परिसरात किरकोळ वादातून गंभीर मारहाणीची घटना घडली आहे. रिक्षा साठी लावलेल्या रांगेतून सुरू झालेला वाद पुढे जमावाच्या हल्ल्यात परिवर्तित झाला. या घटनेत तीन मुली आणि एका मुलाला मारहाण करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
रिक्षाच्या रांगेतून सुरू झालेला वाद..
ही घटना शुक्रवारी सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता मालाड (पूर्व) रेल्वे स्थानकाबाहेर घडली. तक्रारदार किंजल गोहेल (२२) ही आपल्या मैत्रिणी पूजा शाह, कशिश शाह आणि देव शाह यांच्यासोबत रिक्षाच्या रांगेत उभी होती. त्यांचा नंबर आल्यावर दोन अनोळखी महिलांनी रांग तोडून रिक्षामध्ये बसण्याचा प्रयत्न केला. यावरून दोन्ही गटांमध्ये वाद झाला. त्या महिलांनी शिवीगाळ आणि धमकी देत रिक्षामधून निघून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
लक्ष्मण नगरमध्ये हल्ला
यानंतर सायंकाळी सुमारे ८ वाजता किंजल आणि तिचे मित्र दुसऱ्या वाहनाने घरी परतत असताना लक्ष्मण नगर परिसरात, मयूर ज्वेलर्सजवळ, त्यांना अडवण्यात आले. यावेळी त्या दोन महिलांसोबत २० ते २५ जणांचा जमाव होता. या जमावाने मुला-मुलींना रिक्षातून ओढून बाहेर काढत त्यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप आहे.
गुन्हा दाखल, ५ जण अटकेत
या प्रकरणी किंजल गोहेल यांनी कुरार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी १२ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून त्यात तीन महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
भारतीय न्याय संहिता कलम ३५२ (जाणीवपूर्वक अपमान करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न) आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अंजुम, फातिमा अकबर, इद्रीस सुरती, साहिल आणि इम्तियाज यांचा समावेश आहे.
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेनंतर शिवसेना नेते संजय निरुपम यांनी पोलिस ठाण्यात भेट देत घटनेचा निषेध केला. "ही फक्त या मुलींची बाब नाही, तर संपूर्ण मुंबईतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. इस्लामपूरा, पठाणवाडी आणि कुरारसारख्या भागांमध्ये असुरक्षितता वाढत आहे," असे त्यांनी म्हटले.
तसेच पोलिसांनी कारवाईत उशीर केल्याचा आरोप करत, गेल्या वर्षी याच काळात अशाच प्रकारची घटना या परिसरात घडल्याचेही त्यांनी नमूद केले.
रिक्षाच्या रांगेतील किरकोळ वादातून इतका गंभीर प्रकार घडल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली असून, अशा घटनांवर कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे.