मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकांसाठी आज (दि. १५) मतदान प्रक्रिया सुरू असताना, मुंबई पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांना केलेल्या मदतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विविध मतदान केंद्रांवर पोलिस कर्मचारी वयोवृद्ध मतदारांना आधार देत मतदानासाठी आत नेताना, तर काही ठिकाणी अडथळे असलेल्या रस्त्यांवर व्हीलचेअरवरील मतदारांना मदत करताना दिसून आले. माटुंगा, माहीम, आझाद मैदान, कफ परेड, डोंगरी आणि सर जे.जे. मार्ग परिसरातील अशी दृश्ये दाखवणारी अनेक छायाचित्रे व व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
२८,००० हून अधिक पोलिस तैनात
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शहरातील १०,२३१ मतदान केंद्रांवर पोलिस, एसआरपीएफ, क्यूआरटी पथकांसह २८,००० हून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच, अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. विशेषतः सकाळच्या सत्रात लवकर मतदान करण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर दिसून आली.
सोशल मीडियावर कौतुकाची थाप
सोशल मीडियावर नागरिकांनी मुंबई पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले आहे. एका युजरने लिहिले, “मुंबई पोलिसांच्या कार्याला सलाम." तर दुसऱ्या एका युजरने म्हटले, "मुंबई पोलीस नेहमीच आमच्यासोबत असतात; मात्र मतदान सर्वांसाठी सुलभ होण्यासाठी योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध असणेही तितकेच आवश्यक आहे.”
मुंबई पोलीस नेहमीच आमच्यासोबत...
अजून एका युजरने म्हटले, "मतदान केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य रस्ते आणि सुविधा असणेही तितकेच गरजेचे आहे. मुंबई पोलीस नेहमीच आमच्यासोबत असतात; पण कृपया त्यांच्यासोबत कोण आहे याचाही विचार करा आणि योग्य उमेदवाराची निवड करा.”
मुंबई पोलीस केवळ यंत्रणा नाही, तर...
एका युजरने पोलिसांचे कौतुक करत म्हटले, "मुंबई पोलीस ही केवळ एक यंत्रणा नाही, तर शहराची सुरक्षितता आहे. प्रत्येक संकटात खंबीरपणे उभी राहणारी, प्रत्येक जीवाचे रक्षण करणारी आणि धैर्य, प्रामाणिकपणा व त्यागाच्या भावनेने मुंबईची सेवा करणारी.”
दिव्यांगांसाठीही सुविधा का नाही?...
काही युजर्सने पोलिसांचे कौतुक केले मात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच दिव्यांगांसाठी योग्य पायाभूत सुविधांचा अभाव असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. एकाने म्हटले की, “पोलीस आणि अधिकाऱ्यांना सलाम. पण ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांगांसाठीही वापरता येईल अशी पायाभूत सुविधा आपण का उभारू शकत नाही?”
तर आणखी एका युजरने नमूद केले, “इतकं सगळं करूनही त्यांना सरकारकडून जे लाभ आणि जीवनमान मिळायला हवं, ते मिळत नाही. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.”
मतदारांचा वाढता प्रतिसाद
तथापि, मतदानाला सकाळी ७:३० वाजता सुरुवात झाली असून सकाळी ९:३० पर्यंत ६.९८%, ११:३० पर्यंत १७.७३% तर दुपारी १:३० पर्यंत २९.९६% इतक्या मतदानाची नोंद झाली आहे. दुपारनंतर मतदारांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.