मुंबई आणि उपनगरांमध्ये मंगळवार (दि. २३) रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून वाहतूक आणि उपनगरी रेल्वे सेवांवर परिणाम झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) बुधवारी (दि. २४) पहाटे मुंबई आणि पालघरसाठी काही तासांचा रेड अलर्ट जारी केला होता. त्यानंतर सकाळी हा इशारा ऑरेंज अलर्टमध्ये बदलण्यात आला.
आयएमडीने पहाटे ४ वाजता मुंबई आणि पालघरसाठी तीन तासांचा रेड अलर्ट जारी करत मेघगर्जना, विजांचा कडकडाट, अतिवृष्टी आणि ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा इशारा दिला होता. सकाळी ७ वाजता हा इशारा ऑरेंज अलर्टमध्ये बदलण्यात आला. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मान्सूनचे मुंबईत आगमन
यंदा नैऋत्य मान्सूनने २३ जून रोजी मुंबईत प्रवेश केला. मान्सूनच्या आगमनाला यंदा नेहमीपेक्षा सुमारे १३ दिवसांचा विलंब झाला. मुंबईत मान्सून दाखल होण्याची सरासरी तारीख ११ जून मानली जाते. आयएमडीच्या माहितीनुसार, १९५० नंतरचा हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विलंबित मान्सून आहे.
काही भागांत ३०० मिमीहून अधिक पाऊस
बृहन्मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत काही भागांमध्ये ३०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली.
पश्चिम उपनगरांमध्ये :
मालवणी - ३४३ मिमी
मालाड डेपो - ३१४ मिमी
एमसीएमसीआर पवई - २९४ मिमी
मरोळ अग्निशमन केंद्र - २६४ मिमी
वांद्रे अग्निशमन केंद्र - २५६ मिमी
पूर्व उपनगरांमध्ये :
भांडुप एस वॉर्ड कार्यालय - २५९ मिमी
चेंबूर एम-पश्चिम वॉर्ड कार्यालय - २५७ मिमी
मानखुर्द महाराष्ट्र नगर - २६२ मिमी
दक्षिण मुंबईत :
परळ एफ-दक्षिण वॉर्ड कार्यालय - ३४३ मिमी
दादर अग्निशमन केंद्र - २९६ मिमी
वडाळा नाडकर्णी पार्क - २९४ मिमी
मुंबई सेंट्रल नायर रुग्णालय - २४९ मिमी
मलबार हिल - २४८ मिमी
अंधेरी सबवे बंद, इतर मार्ग सुरू
मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने तो वाहनांसाठी बंद करण्यात आला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तैनात राहून वाहनांना सबवेमध्ये प्रवेश करण्यापासून रोखले. एव्हरार्ड नगर परिसरातील सबवेमध्येही पाणी साचल्याची नोंद झाली.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अंधेरी सबवेतील पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.
ट्रान्स हार्बर मार्गावर रेल्वे सेवांना फटका
मुसळधार पावसामुळे तुर्भे आणि कोपरखैरणे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाखालची माती खचल्याने ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे सेवांवर परिणाम झाला. पहाटे ५.०६ वाजता अप मार्ग आणि ५.५० वाजता डाउन मार्ग असुरक्षित घोषित करण्यात आला.
रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. सकाळी ७.२७ वाजता अप मार्ग आणि ७.३५ वाजता डाउन मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला. मात्र वेगमर्यादा लागू करण्यात आल्याने गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.
याशिवाय मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील गाड्या २० ते २५ मिनिटे, हार्बर मार्गावरील गाड्या १५ ते २० मिनिटे, तर पश्चिम रेल्वेच्या गाड्या सुमारे १० मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
तापमानातही मोठी घट
मान्सूनच्या आगमनानंतर मुंबईतील तापमानात लक्षणीय घट झाली आहे. सांताक्रूझ वेधशाळेत बुधवारी सकाळी कमाल तापमान २५ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. गेल्या २४ तासांत तापमानात जवळपास १० अंश सेल्सियसची घट झाल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे.
पुढील ४८ तास महत्त्वाचे
आयएमडीच्या अंदाजानुसार, मुंबई आणि महानगर प्रदेशात पुढील ४८ तास मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. नागरिकांनी आवश्यक तेवढ्याच कामासाठी घराबाहेर पडावे आणि स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.