

मुंबई आणि उपनगर परिसराला रविवारी (दि. १४) रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपले असून सोमवारी पहाटेपासून पावसाचा जोर आणखी वाढला. मुंबईत पुढील काही तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यासाठी भारतीय हवामान विभागाने (IMD) रेड अलर्ट जारी केला आहे.
पाणी साचले, वाहतूक विस्कळीत
पावसामुळे शहरात वाहतूक विस्कळीत झाली आहे. सायन, किंग्ज सर्कल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहनांची कोंडी झाली. वडाळ्याजवळ मोनोरेल अडकली असून अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. परिणामी, गोखले पुलाकडे वाहनं वळवावी लागली आणि तेथेही प्रचंड गर्दी झाली.
भायखळा, महालक्ष्मी आणि किंग्ज सर्कलसह अनेक भाग पाण्याखाली गेले असून नागरिकांना गुडघ्यापर्यंत पाण्यातून वाट काढावी लागत आहे. परिस्थिती लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर पडू नये, अशी सूचना दिली आहे.
मुंबईसह राज्यातील इतर भागांमध्येही पावसाचा जोर कायम आहे. रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेली ही संततधार अजून काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुढील तीन तासांत मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांसाठी पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.