हिटवेव्हनंतर हवामानात बदल! मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पावसाचा अंदाज; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई महानगर प्रदेशाबरोबरच हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक शहरांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
हिटवेव्हनंतर हवामानात बदल! मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पावसाचा अंदाज; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
संग्रहित फोटो
Published on

मुंबई आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट जाणवत असताना नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने (RMC) दिलेल्या अंदाजानुसार १८ आणि १९ मार्च रोजी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये हलक्या पावसासह मेघगर्जनेची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात अनेक भागांमध्ये तापमान सामान्यपेक्षा जास्त नोंदवले गेले होते. काही ठिकाणी तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढेही गेले होते.

पुणे, नाशिकसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई महानगर प्रदेशाबरोबरच हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक शहरांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वाहणारे वारे वाहण्याची शक्यता आहे.

यलो अलर्ट जाहीर करण्यात आलेले जिल्हे :

रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम आणि यवतमाळ.

हवामान खात्याकडून खबरदारीच्या सूचना

  • वादळी व विजांच्या कडकडाटाच्या वेळी मोकळ्या जागेत किंवा शेतात काम करणे टाळा.

  • वादळाच्या वेळी उंच झाडे किंवा उंच संरचनांच्या खाली आसरा घेऊ नका.

  • घरातील विद्युत व इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे प्लग काढून ठेवा.

  • पाण्याच्या ठिकाणांमधून (तलाव, स्विमिंग पूल, नदी, समुद्र इ.) तात्काळ बाहेर या.

  • वीज वाहून नेणाऱ्या वस्तूंंपासून (धातूच्या वस्तू, वायर इ.) दूर रहा.

मुंबईच्या तापमानात थोड्या प्रमाणात घट

रविवारी (दि.१५) सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान ३१.९°C आणि किमान तापमान २३.५°C नोंदवले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा २.६ अंशांनी जास्त होते. शहरातील आर्द्रता ८५ टक्के इतकी नोंदवली गेली.

हिटवेव्हनंतर हवामानात बदल! मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पावसाचा अंदाज; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Weather : हवामान खात्याचा अंदाज; राज्यात चार दिवस वादळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

गेल्या आठवड्यात तापमान ४०°C च्या पुढे गेल्यानंतर आठवड्याच्या शेवटी कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे.

एप्रिल-मे महिन्यात पुन्हा उष्णतेचा इशारा

भारतीय हवामान विभागाच्या मार्च ते मे २०२६ या कालावधीतील 'हॉट वेदर आऊटलुक' नुसार एप्रिल आणि मे महिन्यात राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in