

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ६ डिसेंबर १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्लीत महापरिनिर्वाण झाले. त्यानंतर ७ डिसेंबरला मुंबईतील चैत्यभूमी याठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. आंबेडकरांच्या अफाट ज्ञानाची, कार्याची महती ध्यानात ठेवून मुंबईतील चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी दरवर्षी आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. यावर्षी डॉ. आंबेडकरांचा ६९ वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांचे काही निवडक विचार.
"आपले उद्दिष्ट काय आहे ते नीट समजून घ्या. शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट व आकांक्षा आहे हे तुमच्या मनात ठसू द्या. तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा. म्हणजे तुम्हाला दररोज आठवण राहील की ज्या आकांक्षा आपण उराशी बाळगून आहोत. ज्याच्यासाठी आम्ही लढत आहोत ते काही लहान सहान संकुचित ध्येय नाही. थोड्याश्या नोकऱ्यांसाठी किंवा सवलतींसाठी आपला लढा नाही. आमच्या अंतःकरणातील आकांक्षा फार मोठ्या आहेत. शासनकर्ती जमात बनणे हीच ती आकांक्षा होय."
"शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही"
"जो समाज शिक्षणापासून दूर राहतो, तो प्रगतीपासूनही दूर राहतो."
“स्वाभिमानाशिवाय जगणे म्हणजे जिवंत असूनही मृत असण्यासारखे आहे.”
“जोपर्यंत समाजातील विषमता दूर होत नाही, तोपर्यंत खरे स्वातंत्र्य मिळू शकत नाही.”
'जे इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाहीत. इतिहास कधी विसरायचा नसतो. त्यातून अनेक गोष्टी शिकायच्या असतात. ज्या चुका इतिहासात झाल्या त्या पुन्हा होऊ द्यायच्या नसतात. त्यावेळीच तुम्ही इतिहास घडवू शकता."
"माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे. लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची."
"शिका! संघटित व्हा! संघर्ष करा!"
"शंभर वर्षे शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा!"
"जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या, कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल."