

कोलकाता : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
विशेष सघन पुनर्रक्षण (एसआयआर) प्रक्रियेदरम्यान राज्यातील ९० लाख मते वगळल्याबद्दल बंगालची जनता भारतीय जनता पक्षाकडून सूड घेईल, असा घणाघात केजरीवाल यांनी सोमवारी केला. मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर फेरफार करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
कोलकाता येथे झालेल्या एका जाहीर संवाद कार्यक्रमात बोलताना केजरीवाल यांनी ममता बॅनर्जी यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. हुकूमशाहीविरुद्ध बंगालची जनता ज्या पद्धतीने लढा देत आहे, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, असे केजरीवाल म्हणाले.
राज्यातील वातावरण पाहता ९० लाख मते कमी केल्याचा बदला जनता घेईल, असे चित्र दिसत असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही पक्षाच्या विजयाबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला आहे. ‘पदयात्रा’ आणि ‘जनसभा’मधून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता 'मा-माती-माणूस'चा विजय आता केवळ वेळेचा विषय असल्याची पोस्ट त्यांनी 'एक्स'वर केली आहे. बंगालची भूमी ही संस्कृती आणि सौहार्दाचे प्रतीक असून बंगालचा वारसा मलिन करू पाहणाऱ्या आणि सत्तेसाठी जनतेच्या प्रतिष्ठेशी खेळणाऱ्या विभाजनकारी शक्तींना येथे स्थान नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.