NEET पुनर्परीक्षेपूर्वी Telegram वरील बंदी कायम; दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

नीट (NEET) २०२६ पुनर्परीक्षेपूर्वी टेलिग्रामवरील तात्पुरत्या बंदीविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. केंद्र सरकारने...
NEET पुनर्परीक्षेपूर्वी Telegram वरील बंदी कायम; दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
NEET पुनर्परीक्षेपूर्वी Telegram वरील बंदी कायम; दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

नवी दिल्ली : २१ जून रोजी होणाऱ्या नीट (NEET) २०२६ पुनर्परीक्षेपूर्वी पेपरफुटी रोखण्यासाठी टेलिग्रामवर २२ जूनपर्यंत घालण्यात आलेल्या तात्पुरत्या बंदीविरोधात कंपनीने दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि. १९) फेटाळली.

लाइव्ह लॉच्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती तेजस करिया यांनी निकाल देताना माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६९A अंतर्गत प्लॅटफॉर्मवरील प्रवेश मर्यादित करण्यासाठी अवलंबण्यात आलेल्या प्रक्रियेबाबत समाधान व्यक्त केले. तसेच या प्रकरणातील केंद्र सरकारची कारवाई योग्य असल्याचे न्यायालयाने नमूद केले. कारवाईमागील कारणे पुरविण्यात आली नसल्याच्या आधारावर करण्यात आलेले आव्हानही न्यायालयाने फेटाळून लावले.

केंद्र सरकारला अधिकार असल्याचे न्यायालयाचे मत

न्यायालयाने स्पष्ट केले की, माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६९A अंतर्गत केंद्र सरकारला एखाद्या प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचा अधिकार आहे. तसेच ही कारवाई प्रमाणबद्धतेच्या निकषांवरही योग्य ठरते, कारण उपलब्ध पर्यायांपैकी हा आवश्यक उपाय होता.

राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) आणि शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाच्या शिफारशींनंतर टेलिग्रामविरोधातील तात्पुरता बंदी आदेश जारी करण्यात आला होता.

टेलिग्रामचा दावा

टेलिग्रामने न्यायालयात दावा केला की, नीट परीक्षेशी संबंधित बेकायदा मजकूर असलेल्या ९०० हून अधिक लिंक्स प्लॅटफॉर्मवरून हटविण्यात आल्या आहेत. तसेच बेकायदा माहितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येत असल्याचे कंपनीने सांगितले.

केंद्र सरकारची बाजू

दुसरीकडे, केंद्र सरकारने न्यायालयात सांगितले की, टेलिग्रामच्या तांत्रिक आणि संरचनात्मक वैशिष्ट्यांमुळे बॉट्स (स्वयंचलित संगणकीय खाती) यांच्या माध्यमातून स्वयंचलित अकाउंट्स तयार करणे आणि मोठ्या प्रमाणावर मेसेज प्रसारित करणे शक्य होते आणि त्यासाठी सतत मानवी हस्तक्षेपाची आवश्यकता नसते.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात सांगितले की, "एकदा एखादा बॉट बंद करण्यात आला तरी तो दुसऱ्या बॉटकडे आपोआप वळवला जाऊ शकतो. त्यामुळे अशा माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर माहितीचा प्रसार होण्याची शक्यता कायम राहते."

सुनावणीदरम्यान न्यायालयाची टिप्पणी

सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती तेजस करिया यांनी तोंडी निरीक्षण नोंदवत केंद्र सरकारला प्रश्न विचारला होता की,"केवळ एका गटातील नागरिक (नीट परीक्षार्थी) परीक्षा देत असल्यामुळे १५ कोटी युजर्सचे अधिकार मर्यादित केले जाऊ शकतात का?"

पावेल दुरोव्ह यांची प्रतिक्रिया

टेलिग्रामचे मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल दुरोव्ह यांनीही या कारवाईवर आक्षेप घेतला होता. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे पेपरफुटीसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींना नव्हे तर भारतातील १५ कोटींहून अधिक सर्वसामान्य टेलिग्राम युजर्सना शिक्षा होत असल्याचा दावा त्यांनी केला होता.

logo
marathi.freepressjournal.in