Wayanad Disaster: वायनाड बळींची संख्या १६७ वर; १९१ जण अद्यापही बेपत्ता

Wayanad Disaster: वायनाड बळींची संख्या १६७ वर; १९१ जण अद्यापही बेपत्ता

मुसळधार पावसामुळे केरळमधील वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनातील मृतांचा आकडा १६७ वर पोहचला आहे, तर १९१ जण अद्याप बेपत्ता असल्याचे समोर आले आहे.
Published on

वायनाड : मुसळधार पावसामुळे केरळमधील वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनातील मृतांचा आकडा १६७ वर पोहचला आहे, तर १९१ जण अद्याप बेपत्ता असल्याचे समोर आले आहे.

वायनाडमधील बचावकार्य वेगाने सुरू आहे. केरळमध्ये अशी घटना यापूर्वी कधीही घडली नव्हती, असे केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी सांगितले.

या आपत्तीत बुधवारपर्यंत १६७ जणांच्या मृत्यूची नोंद वायनाड जिल्हा प्रशासनाने केली आहे.

तत्पूर्वी, तिरुवनंतरपुरम येथे पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री म्हणाले की, आतापर्यंत १४४ मृतदेह सापडले आहेत. त्यात ७९ पुरुष आणि ६४ महिलांचा समावेश आहे. ताज्या आकडेवारीनुसार अद्यापही १९१ जण बेपत्ता आहेत. तत्पूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री विजयन यांनी या आपत्तीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियाबाबत शोक व्यक्त केला. विजयन म्हणाले की, मुलदक्काई आणि चोरलमाला या जिल्ह्यांतील परिस्थिती भयानक झाली आहे. हे दोन्ही जिल्हे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. आपत्ती झोनमध्ये अडकलेल्या लोकांना वाचविण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. दोन दिवसांत बचाव कार्यात १,५९२ जणांचा जीव वाचविण्यात यश आले आहे. बचावकार्यात समन्वय साधून कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांना वाचविण्याची मोहीम आखली आहे, असे ते म्हणाले. पहिल्या टप्प्यात परिसरातील ६८ कुटुंबांमधील २०६ जणांना तीन कँपमध्ये हलविले आहे. त्यात ७५ पुरुष, ८८ महिला आणि ४३ लहानग्यांचा समावेश आहे. भूस्खलनानंतर या बचाव मोहिमेमुळे १३८६ लोकांना वाचविण्यात यश आले आहे. त्यापैकी अनेक जण घरात अडकले होते. ५२८ पुरुष, ५५९ महिला आणि २९९ मुले यांना ७ कँम्प्समध्ये स्थलांतरीत करण्यात आले, असे त्यांनी सांगितले.

Wayanad Disaster: वायनाड बळींची संख्या १६७ वर; १९१ जण अद्यापही बेपत्ता
वायनाडमध्ये भूस्खलन! १२३ जणांचा मृत्यू, ४०० जण बेपत्ता; केरळात दोन दिवसांचा दुखवटा

विजयन म्हणाले की, वायनाड जिल्ह्यात सध्या ८२ मदत शिबिरांमध्ये ८,०१७ लोकांना ठेवण्यात आले आहे. त्यात १९ गर्भवती महिलाही आहेत. मेप्पडी येथे ८ कँपमध्ये ४२१ कुटुंबांतील १,४८६ लोक राहत आहेत.

बचावकार्य सुरूच

दरम्यान, लष्कर, नौदल आणि एनडीआरएफ हे संयुक्तपणे ही बचाव मोहीम राबवत आहेत. भूस्खलनामुळे अनेक घरे चिखलाखाली गाडली गेली आहेत. त्यातून वाट काढत ही पथके बचावकार्य करत आहेत. लष्कराच्या तुकड्यांनी या भागातून मंगळवारी रात्रीपर्यंत १००० जणांचा बचाव केल्याचे सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in