पनवेलमधील ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला 'डिजिटल अरेस्ट' करत सायबर फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्ली एटीएसचे अधिकारी असल्याचे भासवून सायबर गुन्हेगारांनी आठ दिवस व्हिडिओ कॉलवर ठेवत तब्बल १.५४ कोटी रुपये उकळल्याचा प्रकार उघड झाला आहे. नवी मुंबई सायबर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.
दिल्ली एटीएसचे नाव सांगून संपर्क
मिळालेल्या माहितीनुसार, २३ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलद्वारे संबंधित व्यक्तीशी संपर्क साधण्यात आला. स्वतःला दिल्ली एटीएस मुख्यालयातील अधिकारी असल्याचे सांगत आरोपींनी, पीडिताच्या नावावर असलेला सिमकार्ड दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणात आणि २.७५ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारात वापरल्याचा खोटा दावा केला.
'डिजिटल अरेस्ट' दाखवत भीती निर्माण
यानंतर आरोपींनी पीडिताला 'डिजिटल अरेस्ट' असल्याचे सांगत सतत व्हिडिओ कॉलवर राहण्यास भाग पाडले. तपास सुरू असल्याचे भासवत २४ तास संपर्कात राहण्यास सांगण्यात आले.
भीती वाढवण्यासाठी आरोपींनी बनावट अटक वॉरंट आणि आरबीआयच्या शिक्क्यासह खोटे दस्तऐवजही पाठवले, ज्यामुळे संपूर्ण प्रकार अधिक विश्वासार्ह वाटावा असा प्रयत्न करण्यात आला.
१.५४ कोटी रुपयांची उकळपट्टी
‘तपासासाठी पडताळणी'च्या बहाण्याने आरोपींनी पीडिताला विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास भाग पाडले. तपास पूर्ण झाल्यानंतर पैसे परत मिळतील, असे सांगत विश्वास संपादन करण्यात आला.
कायद्याच्या कारवाईच्या भीतीने पीडिताने २३ ते ३१ मार्चदरम्यान एकूण १.५४ कोटी रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर आरोपींनी पनवेल पोलीस ठाण्यात कागदपत्रे घ्यायला सांगितले. मात्र तेथे गेल्यावर कोणतेही प्रकरण नसल्याचे समजताच फसवणूक झाल्याचे उघड झाले.
गुन्हा दाखल, तपास सुरू
पीडिताच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२), ३३८, ३४०(२), ३५१(४) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
कोणतीही सरकारी संस्था किंवा पोलीस व्हिडिओ कॉलद्वारे अटक करत नाहीत किंवा पडताळणीसाठी पैसे मागत नाहीत, असे स्पष्ट करत पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. संशयास्पद कॉल आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा किंवा १९३० या सायबर हेल्पलाइनवर तक्रार नोंदवावी, असेही सांगण्यात आले आहे.