

भारतीय हवामान विभागाने (IMD) ठाणे आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा उष्णतेचा इशारा दिला आहे. सोमवार (दि.९ मार्च) रोजी जाहीर केलेल्या हवामान खात्याच्या माहितीनुसार, काही भागांत 'उष्ण ते अतिउष्ण' परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. ही स्थिती १० मार्चपर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील ४८ तासांत जिल्ह्यात तीव्र उष्णतेचा तडाखा बसण्याची शक्यता असून, उष्णतेसोबतच वाढलेली आर्द्रता (ह्युमिडिटी) नागरिकांच्या आरोग्यासाठी धोका निर्माण करू शकते. तसेच, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ११ मार्चपासून हवामान कोरडे (DRY) राहील, अशी माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, उष्णतेमुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
पुरेसे पाणी प्या : शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी नियमितपणे पाणी, लिंबूपाणी, ताक यांसारखे इलेक्ट्रोलाइटयुक्त पेय पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे, जरी तहान लागली नसेल तरीही या पेयांचे सेवन करणे आवश्यक आहे.
दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळा : साधारण दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हाची तीव्रता जास्त असल्याने शक्यतो बाहेर जाणे टाळावे.
योग्य कपडे परिधान करा : हलके, सैल आणि फिकट रंगाचे सुटी कपडे घालावेत, ज्यामुळे शरीरासाठी हवा खेळती राहील.
लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्या : लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना थंड आणि हवेशीर ठिकाणी ठेवावे.
आरोग्याच्या समस्यांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला
स्थानिक प्रशासनाने नागरिकांना गरगरणे, जास्त घाम येणे, अशक्तपणा यांसारखी उष्माघाताची लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घेण्याचा सल्ला दिला आहे.