

मुंबईत वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उष्माघातापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. उन्हाचा तडाखा वाढत असताना नागरिकांनी बाहेर पडताना योग्य खबरदारी घ्यावी, पुरेसे पाणी प्यावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
काय करावे?
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, तहान लागली नसली तरी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच हलक्या रंगाचे आणि सैलसर सुती कपडे परिधान करावेत. घराबाहेर पडताना चष्मा, टोपी, छत्री यांचा वापर करावा. आहारात ताजी फळे, ताक, लिंबूपाणी, नारळपाणी यांसारख्या थंड पेयांचा समावेश करावा, असेही सांगण्यात आले आहे.
याशिवाय, घर शक्यतो थंड राहील याची काळजी घ्यावी. खिडक्यांना पडदे किंवा सनशेड लावावेत आणि रात्री हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवाव्यात. उन्हात गेल्यानंतर डोके, मान, चेहरा आणि हात-पाय ओलसर कापडाने पुसावेत. तसेच अशक्तपणा किंवा त्रास जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळच्या महापालिका रुग्णालयात जावे, असेही महापालिकेने म्हटले आहे.
काय करू नये?
दरम्यान, शक्यतो दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणे टाळावे. अधिक वेळ उन्हात उभे राहणे टाळावे. मद्यपान, चहा, कॉफी किंवा कार्बोनेटेड शीतपेयांचे सेवन टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. उच्च प्रथिनेयुक्त अन्न, शिळे अन्न इत्यादींचे सेवन टाळावे. तसेच पार्क केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नयेत, अशीही सूचना देण्यात आली आहे.
उष्णतेचा वाढता परिणाम लक्षात घेता नागरिकांनी या सूचनांचे पालन करून आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.