

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाची इमारत गेल्या चार ते पाच वर्षांपासून अतिधोकादायक घोषित करण्यात आली असतानाही याच इमारतीच्या तळमजल्यावर आपत्कालीन कक्ष कार्यरत असल्याने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इमारतीतील इतर विभाग सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असताना, आपत्कालीन विभाग मात्र अद्याप या पडक्या इमारतीतूनच सुरू आहे.
इमारतीतील स्लॅबचे प्लास्टर अधूनमधून कोसळत असल्याने कर्मचारी दररोज भीतीच्या वातावरणात काम करत आहेत. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. आपत्कालीन कक्षात ड्रेनेजचे पाणी साचत असल्याने कर्मचाऱ्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. शहरात स्वच्छतेबाबत जनजागृती करणारे महापालिका प्रशासन स्वतःच्या कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ कार्यस्थळ उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरत असल्याची टीका होत आहे.