नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका व्यापार करारावर वाटाघाटी करण्याची योजना आखत आहेत आणि दोन्ही देश बाजारपेठेतील प्रवेश वाढवणे, आयात शुल्क आणि नॉन-टेरिफ अडथळे कमी करणे आणि पुरवठा साखळी एकत्रीकरण वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतील, अशी माहिती मंगळवारी संसदेत देण्यात आली.
लोकसभेत एका लेखी उत्तरात वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी सांगितले की, आजपर्यंत अमेरिकेने भारतावर परस्पर शुल्क लादलेले नाही. दोन्ही देशांनी परस्पर फायदेशीर, बहु-क्षेत्रीय द्विपक्षीय व्यापार करारावर वाटाघाटी करण्याची योजना आखली आहे. दोन्ही देश बाजारपेठेतील प्रवेश वाढवणे, शुल्क आणि नॉन-टेरिफ अडथळे कमी करणे आणि पुरवठा साखळी एकत्रीकरण वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतील, असे ते म्हणाले.
अमेरिकेने १३ फेब्रुवारी रोजी परस्पर व्यापार आणि आयात शुल्कांबाबत निवेदन जारी केले. त्यामध्ये वाणिज्य सचिव आणि युनायटेड स्टेट्स व्यापार प्रतिनिधी यांनी व्यापार भागीदारांद्वारे स्वीकारलेल्या कोणत्याही बिगर-परस्पर व्यापार व्यवस्थेपासून अमेरिकेला झालेल्या हानीची तपासणी करण्यासाठी आवश्यक कृती करणे आणि प्रत्येक व्यापार भागीदारासाठी तपशीलवार प्रस्तावित उपायांसह अहवाल प्रदान करणे, असे नमूद केले आहे. टॅरिफ म्हणजे आयात शुल्क हे सरकारद्वारे लागू केलेले आणि गोळा केलेले आयात शुल्क आहेत आणि परदेशी वस्तू देशात आणण्यासाठी कंपन्यांनी ते भरलेले असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या महिन्यात वॉशिंग्टन भेटीदरम्यान, भारत आणि अमेरिकेने २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करून ५०० अब्ज अमेरिकन डॉलर करण्यासाठी आणि २०२५ च्या अखेरीस परस्पर फायदेशीर, बहु-क्षेत्रीय द्विपक्षीय व्यापार कराराच्या (बीटीए) पहिल्या टप्प्यावर वाटाघाटी करण्याची त्यांची वचनबद्धता जाहीर केली.
अमेरिकेबरोबरची भारताची व्यापार तूट ४३.६५ अब्ज डॉलरवर
२०२३ मध्ये, यूएस-भारताचा वस्तू आणि सेवांमधील द्विपक्षीय व्यापार १९०.०८ अब्ज अमेरिकन डॉलर (१२३.८९ अब्ज अमेरिकन डॉलर वस्तू आणि ६६.१९ अब्ज अमेरिकन डॉलर सेवा व्यापार) होता. त्या वर्षी, भारताची अमेरिकन डॉलरमधील व्यापारी मालाची निर्यात ८३.७७ अब्ज अमेरिकन डॉलर होती, तर आयात ४०.१२ अब्ज डॉलर झाली होती. त्यामुळे भारताच्या बाजूने ४३.६५ अब्ज अमेरिकन डॉलरची व्यापार तूट राहिली. २०२१-२४ दरम्यान अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. भारताची व्यापार तूट असलेल्या मोजक्या देशांपैकी अमेरिका एक आहे.
प्रसाद म्हणाले की, भारताने परस्पर फायदेशीर आणि न्याय्य रीतीने द्विपक्षीय व्यापार संबंध वृद्धिंगत आणि व्यापक करण्यासाठी अमेरिकेशी संलग्नता कायम ठेवली आहे. हा एक सततचा प्रयत्न आहे आणि भारतीय निर्यातदार व्यापार आणि विविद देशांमध्ये निर्यात करण्यासाठी काम करत आहेत.
मुक्त व्यापार करार करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू
भारत डब्ल्यूटीओ (वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन) चा सदस्य आहे आणि उत्पादन श्रेणीवर लागू केल्या जाऊ शकणाऱ्या जास्तीत जास्त आयात शुल्काला बांधील आहे. लागू केलेले दर सामान्यतः दिलेल्या कमोडिटीसाठी बंधनकारक दरापेक्षा कमी असतात. मात्र, बदलत्या व्यापार परिस्थितीसह, भारत प्राधान्य/मुक्त व्यापार करार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामध्ये पीटीए/एफटीए सदस्यांमधील भरीव व्यापारावर सीमा शुल्क आणि नॉन-टेरिफ अडथळे कमी किंवा दूर केले जातात, असे ते पुढे म्हणाले. सध्या, भारत युरोपियन युनियन, यूके आणि ओमानसोबतच्या वाटाघाटी व्यतिरिक्त १३ एफटीए आणि ९ पीटीएचा सदस्य आहे.