नवी दिल्ली : भाज्यांसह खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने किरकोळ महागाई दर जूनमध्ये चार महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर ५.०८ टक्क्यांवर पोहोचला आहे. ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) आधारित किरकोळ चलनवाढीचा दर जूनमध्ये पुन्हा वाढण्यापूर्वी जानेवारीपासून घसरला होता.
सीपीआय-आधारित किरकोळ महागाई दर मे २०२४ मध्ये ४.८ टक्के आणि जून २०२३ मध्ये ४.८७ टक्के होती. यापूर्वीचा उच्चांक फेब्रुवारीमध्ये ५.०९ टक्के होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये अन्नधान्याची महागाई ९.३६ टक्के होती, जी मेमध्ये ८.६९ टक्के होती. वार्षिक आधारावर जूनमध्ये सर्वात जास्त महागाई भाजीपाल्याची २९.३२ टक्के, त्यानंतर डाळी आणि उत्पादने १६.०७ टक्के होती. तृणधान्ये आणि उत्पादने आणि फळेही गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये महागली होती.
ग्रामीण भागातील किरकोळ चलनवाढ ५.६६ टक्के होती, जी शहरी भारतातील ४.३९ टक्क्यांपेक्षा जास्त होती, असे ‘एनएसओ’च्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.