आंतरराष्ट्रीय

म्यानमारमध्ये भूकंपानंतर मृतदेहांची दुर्गंधी; आधुनिक साधनांच्या अभावामुळे हाताने मलबा हटवण्याचे प्रयत्न

म्यानमारमध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण भूकंपानंतर मंडाले शहरातील रस्त्यावर पडलेल्या मृतदेहांची दुर्गंधी पसरू लागली आहे.

Swapnil S

यांगून : म्यानमारमध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण भूकंपानंतर मंडाले शहरातील रस्त्यावर पडलेल्या मृतदेहांची दुर्गंधी पसरू लागली आहे. यामुळे म्यानमारमध्ये रोगराईचे नवे संकट उभे राहिले आहे.

म्यानमारमध्ये भूकंपात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा लोक शोध घेत आहेत. यंत्रसामुग्री नसल्याने हाताने मलबा हटवण्याचे काम नागरिक करताना दिसत आहेत. या भूकंपात आतापर्यंत १७०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. असंख्य लोक ठिकठिकाणी ढिगाऱ्याखाली दबलेले आहेत.

तुटलेले रस्ते, पडलेले पूल, कोलमडलेली संपर्क यंत्रणा, देशात सुरू असलेल्या यादवीमुळे बचाव व मदत कार्यात येणारे अडथळे कायम आहेत. स्थानिक लोक आधुनिक साधनांशिवाय जिवंत व्यक्तींचा शोध घेत आहेत. ४१ अंश तापमानात लोक फावड्याने ढिगारा हटवत आहेत. रविवारी दुपारी पुन्हा बसलेल्या ५.१ रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर रस्त्यावर नागरिक पुन्हा सैरावैरा पळत सुटले.

मंडालेत राहणाऱ्या १५ लाख जणांनी आपली रात्र रस्त्यावर काढली. कारण भूकंपामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत. सतत होणाऱ्या भूकंपाच्या झटक्यामुळे अस्थिर इमारती पडू शकतात, अशी भीती स्थानिक नागरिकांना आहे.

म्यानमारमधील कॅथलिक रिलीफ सर्व्हिसेसच्या यांगून येथील व्यवस्थापक कॅरा ब्रॅग यांनी सांगितले की, म्यानमारमध्ये १७०० हून अधिक जणांचा मृत्यू, तर ३ हजार जण जखमी झाले आहेत. अनेक क्षेत्रात बचाव कार्य सुरूच झालेले नाही. अनेक ठिकाणी लोक हाताने ढिगारा हटवताना दिसत आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेकडून मदत

म्यानमारमध्ये जागतिक आरोग्य संघटनेकडून तीन टन साहित्य पाठवण्यात आले आहे. मंडाले व न्यू प्याय ताऊ या शहरांची परिस्थिती भीषण आहे. ट्रामा किट‌्स‌, तंबू तसेच हजार बेडच्या रुग्णालयांसाठी लागणारी सामग्री पाठवण्यात आली आहे. हजारो जखमींना तातडीच्या उपचाराची सध्या गरज आहे. शस्त्रक्रियेसाठी सामुग्रीचा अभाव भेडसावत आहे. भूलतज्ज्ञ, जीवनावश्यक औषधे, स्वच्छ पाणी, मानसोपचार तज्ज्ञ आदींची कमतरता जाणवत आहे.

परदेशी मदतीचा ओघ सुरू

भारताने ‘सी-१७’ या विमानाने लष्कराचे वैद्यकीय पथक व १२० जण म्यानमारमध्ये मदतीसाठी पाठवले आहे. हे भारतीय पथक ६० बेडचे आपत्कालीन उपचार केंद्र बनवणार आहे.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत