ओमानच्या किनाऱ्याजवळ रविवारी (दि.१२) 'जीएफएस गॅलेक्सी' (GFS Galaxy) या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारताने तीव्र निषेध केला आहे. जहाजावरील ११ भारतीयांपैकी १० जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून एक भारतीय अद्याप बेपत्ता आहे. त्याचा शोध घेण्यासाठी ओमान प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे.
११ पैकी १० भारतीयांची सुटका
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) रविवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सांगितले की, 'जीएफएस गॅलेक्सी' या व्यापारी जहाजावर ओमानच्या किनाऱ्याजवळ हल्ला झाला. जहाजावरील ११ भारतीय नागरिकांपैकी १० जणांची सुटका करण्यात आली आहे. मात्र, एक भारतीय अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे.
भारतीय दूतावासाची परिस्थितीवर नजर
ओमानमधील भारतीय दूतावास संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. बेपत्ता भारतीयाचा शोध घेण्यासाठी दूतावास ओमानच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय साधत आहे. या मदतीबद्दल भारताने ओमान सरकारचे आभारही मानले आहेत.
व्यापारी जहाजांवरील हल्ले थांबवण्याचे आवाहन
या भागात व्यापारी जहाजांवर आणि नागरी पायाभूत सुविधांवर वारंवार होत असलेले हल्ले अत्यंत चिंताजनक असल्याचे भारताने म्हटले आहे. अशा घटना तातडीने थांबल्या पाहिजेत, असे भारताने स्पष्ट केले.
तणाव कमी करून शांततेचे आवाहन
प्रदेशातील तणाव तातडीने कमी करावा आणि सुरू असलेल्या वाटाघाटींमधून राजनैतिक मार्गाने तोडगा काढावा, असे आवाहन भारताने केले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार आंतरराष्ट्रीय जलमार्गांवरील मुक्त आणि सुरक्षित वाहतूक व व्यापार पूर्ववत सुरू होणे आवश्यक असल्याचेही भारताने नमूद केले.