नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण दरम्यान दोन आठवड्यांच्या तात्पुरत्या युद्धविरामानंतर, 'जग विक्रम' या भारतीय ध्वजधारक एलपीजी टँकरने होर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीरीत्या ओलांडली आहे. शिप-ट्रॅकिंग डेटाच्या माहितीनुसार, युद्धविरामानंतर ही सामुद्रधुनी ओलांडणारे हे पहिले भारतीय जहाज ठरले आहे. हा टँकर शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळच्या दरम्यान या धोरणात्मक जलमार्गातून बाहेर पडला. शनिवारी दुपारी हे जहाज ओमानच्या आखातात होते आणि पूर्वेच्या दिशेने मार्गक्रमण करत होते.
मुंबईस्थित 'ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनीच्या मालकीचे हे जहाज असून त्याची क्षमता २६,००० टनांहून अधिक डेडवेट क्षमता म्हणजेच अंदाजे २०,००० टन एलपीजी वाहून नेण्याची क्षमता आहे. मार्चच्या सुरुवातीपासून पर्शियन गल्फमधून बाहेर पडणारे हे ९ वे भारतीय जहाज आहे. अद्याप सुमारे १५ भारतीय जहाजे या भागात अडकून असून त्यांच्या परतीची प्रतीक्षा आहे.