डायबिटीज म्हणजे केवळ साखर टाळणे एवढ्यावरच मर्यादित नाही, तर प्रत्येक घासात शहाणपण वापरण्याची गरज असते. अनेकांना वाटतं की सुकामेवा म्हणजे आरोग्याचं भांडार – पण हे सगळ्यांसाठी खरं असेलच असं नाही. विशेषत: मधुमेह असणाऱ्यांसाठी काही सुकामेवा तर ‘विषासमान’ ठरू शकतो!
डायबिटीज रुग्णांसाठी सगळ्यात घातक ठरू शकणारे ड्रायफ्रूट्स म्हणजे अंजीर, खजूर आणि प्लम. या तिघांमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण प्रचंड असते.
एक कप अंजीरमध्ये तब्बल २९ ग्रॅम साखर असते, त्यामुळे ब्लड शुगर एकाएकी वाढू शकते.
तसंच प्लम खाल्ल्यानेही साखरेची पातळी झपाट्याने वाढते.
खजूर हे जरी नैसर्गिक एनर्जी देत असले तरी डायबिटीज रुग्णांनी दिवसात जास्तीत जास्त तीनच खजूर खावेत, तेही व्यायाम आणि योग्य आहार घेत असल्यास. अन्यथा खजूर खाणं टाळणंच हिताचं ठरेल.
दुसरीकडे काही ड्रायफ्रुट्स असे आहेत जे डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. अक्रोड, बदाम, काजू आणि पिस्ता हे त्यातले प्रमुख.
अक्रोडमध्ये साखर कमी असून कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. टाईप २ डायबिटीज असणाऱ्यांना अक्रोड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी जवळपास ४७% ने कमी होऊ शकते.
बदाम शरीरात इन्सुलिनची निर्मिती वाढवतो आणि ब्लड शुगर नियंत्रणात ठेवतो. काजूमध्ये गुड फॅट्स असून ते हृदयाच्या आरोग्यासाठीही चांगले मानले जातात.
पिस्ता मात्र या यादीत ‘सुपरफूड’ समजला जातो. फायबर, प्रोटीन, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि झिंक यांसारखी सत्वं यात मुबलक प्रमाणात असतात.
डायबिटीज असणाऱ्यांनी ‘काय खायचं’ याइतकंच ‘किती खायचं’ हेही लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. योग्य प्रमाणात, योग्य वेळेला खाल्लेला सुका मेवा आरोग्यास फायदेशीर आहे, पण बेफिकीरपणे खाल्ल्यास त्याचाच परिणाम शरीरावर घातक ठरू शकतो.
(Disclaimer: या माहितीमध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)