आपल्या आहारातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे मीठ. जेवणात मीठ नसेल तर अळणी जेवण आपल्याला रुचत नाही. मीठामुळे जेवणाला एक उत्तम चव येते. मीठाशिवाय आहाराची आपण कल्पनाही करू शकत नाही. आरोग्याच्या दृष्टीने आहारत मीठ असणे खूप महत्त्वाचे असते. मीठ शरीरातील अनेक द्रव्यांचे संतुलन करते. यामुळे स्नायू, मज्जातंतूचे कार्य नियंत्रित होते. मात्र, हेच मीठ जर आहारात गरजेपेक्षा जास्त प्रमाणात वापरले तर आरोग्याचे गंभीर दुष्परिणाम होतात. कारण उत्तम आरोग्यासाठी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळायलाच हवा. तुम्हालाही आहारात खूप जास्त मीठ खायला आवडते का? जाणून घ्या, आहारात मीठाचे प्रमाण जास्त झाल्यास कोणते दुष्परिणाम होऊ शकतात.
एका दिवसभरात व्यक्तीने किती मीठ खावे
WHO च्या मते एका प्रौढ व्यक्तीने २००० मिलीग्रॅम अर्थात पाच ग्रॅमपेक्षा कमी इतकेच मीठ खावे. सामान्यपणे एक चमचा मीठ व्यक्तीने दररोज खावे. तर २ ते १५ वर्षा पर्यंतच्या मुलांनी त्यांच्या ऊर्जेच्या आवश्यकतेप्रमाणे मीठ खावे.
मीठाचे जास्त सेवन केल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
रक्तदाब वाढणे
जास्त सोडियम तुमच्या रक्तप्रवाहात पाणी ओढते. ज्यामुळे रक्ताचे प्रमाण वाढते आणि नंतर तुमचा रक्तदाब वाढतो. हे हृदयरोग आणि स्ट्रोकचे एक प्रमुख कारण आहे. जास्त मीठ हृदयावर जास्त दबाव टाकू शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे आधीच उच्च रक्तदाब असेल तर मीठाचे प्रमाण कमी असायला हवे.
पोटाच्या कर्करोगाचा धोका
काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की जास्त मीठ पोटाच्या आवरणावर हानिकारक परिणाम करू शकते. ज्यामुळे पोटाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.
जास्त तहान लागणे
जर तुम्ही जास्त मीठ खाल्ले तर ते तुमच्या शरीरातील द्रव संतुलन बिघडू शकते, ज्यामुळे डिहायड्रेशन आणि जास्त तहान लागते आणि संतुलन राखणे कठीण होते.
हाडांसाठी हानिकारक
मीठ हे एकप्रकारचे सोडियम आहे. शरीरात सोडियमचे प्रमाण जास्त असल्याने मूत्रमार्गे कॅल्शियमचे उत्सर्जन वाढते, ज्यामुळे कॅल्शियमची कमतरता निर्माण होते आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढतो.
मूत्रपिंडावर परिणाम
जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील द्रव संतूलन बिघडते. परिणामी मूत्रपिंडाच्या कार्यावर याचा प्रभाव पडू शकतो.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)