हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. वर्षातील १५ दिवसांचा हा काळ पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष मानला जातो. या काळाला पितृपक्ष असे म्हणतात.
शास्त्रानुसार, पितृपक्षात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात. त्यामुळे या काळात पितरांच्या तृप्तीसाठी आणि त्यांच्या शांतीसाठी धार्मिक विधी केले जातात. श्राद्ध आणि पिंडदान करण्यास या दिवसांचे फार महत्त्व आहे. पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो, अशी श्रद्धा आहे.
धार्मिक मान्यतेनुसार, पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत चालतो. म्हणजेच पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे १६ दिवसांचा असतो.
पितृपक्षात घरातील शुभ कार्य जसे की लग्न, गृहप्रवेश किंवा नवीन कामाची सुरूवात करणे टाळले जाते.
पितृ पक्ष २०२५ तारीख
यंदा पितृ पक्ष रविवार ७ सप्टेंबर २०२५ रोजी सुरू होणार असून, रविवार २१ सप्टेंबर २०२५ रोजी समाप्त होईल.
पित पृक्ष २०२५ श्राद्ध तिथी
७ सप्टेंबर २०२५, रविवार- पितृ पक्ष प्रारंभ, प्रौष्ठप्रदी पौर्णिमा
८ सप्टेंबर २०२५, सोमवार प्रतिपदा श्राद्ध
९ सप्टेंबर २०२५ मंगळवार- द्वितीया श्राद्ध
१० सप्टेंबर २०२५, बुधवार- तृतीया श्राद्ध / चतुर्थी श्राद्ध
११ सप्टेंबर २०२५, गुरुवार- पंचमी श्राद्ध / महा भरणी श्राद्ध
१२ सप्टेंबर २०२५, शुक्रवार- षष्ठी श्राद्ध
१३ सप्टेंबर २०२५, शनिवार- सप्तमी श्राद्ध
१४ सप्टेंबर २०२५, रविवार- अष्टमी श्राद्ध
१५ सप्टेंबर २०२५, सोमवार- नवमी श्राद्ध
१६ सप्टेंबर २०२५, मंगळवार दशमी श्राद्ध
१७ सप्टेंबर २०२५, बुधवार- एकादशी श्राद्ध
१८ सप्टेंबर २०२५, गुरुवार- द्वादशी श्राद्ध
१९ सप्टेंबर २०२५, शुक्रवार- त्रयोदशी श्राद्ध / मघा श्राद्ध
२० सप्टेंबर २०२५, शनिवार- चतुर्दशी श्राद्ध
२१ सप्टेंबर २०२५, रविवार- सर्वपित्री दर्श अमावस्या
सर्वपित्री अमावस्या :
पितृपक्षात सर्वपित्री अमावस्या खूप महत्वाची मानली जाते. जर पूर्वजांच्या मृत्यूची अचूक तिथी ठाऊक नसेल, तर या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करणे शुभ ठरते.
पितृपक्षाचे महत्व
पितृपक्षात पितरांचे तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान केले जाते, ज्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती आणि मोक्ष प्राप्त होतो, असे मानले जाते. या काळात पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीनुसार ब्राह्मणांना भोजन, दक्षिणा आणि वस्त्रदान केले जाते. पितरांचे स्मरण केल्याने त्यांच्या आशीर्वादाने जीवनात सुख-समृद्धी येते.