श्रावणात उपवास म्हटलं की साबुदाणा खिचडी, वडा किंवा बटाट्याचे पदार्थ हमखास केले जातात. पण हेच पदार्थ वारंवार खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी उपवासाच्या ताटात काहीतरी वेगळं करून पाहा.
वरीचे तांदूळ आणि ओल्या नारळापासून तयार होणारे मऊसूत, जाळीदार घावन हा त्यासाठी एक छान पर्याय आहे. कमी तेलात तयार होणारा हा पदार्थ चटणी किंवा साजूक तुपासोबत खायला मस्त लागतो. चला, झटपट रेसिपी पाहूया.
साहित्य
वरीचे तांदूळ - १ वाटी
ओलं खोबरं - अर्धी वाटी
हिरवी मिरची - २ ते ३
जिरे - अर्धा चमचा
मीठ - चवीनुसार
पाणी - आवश्यकतेनुसार
तूप किंवा तेल - भाजण्यासाठी
कृती
सर्वप्रथम वरीचे तांदूळ मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याचे पीठ तयार करून घ्या. त्यात ओलं खोबरं, थोडं पाणी आणि मीठ घालून पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या.
हे मिश्रण एका भांड्यात काढून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घाला. पीठ नेहमीच्या घावनाप्रमाणे थोडं पातळ असावं. त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि जिरे घालून मिश्रण एकजीव करा.
आता तवा चांगला गरम करून त्यावर अगदी थोडं तूप किंवा तेल लावा. गरम तव्यावर पिठाची पळी कडेपासून मध्यभागी सोडत घावन पसरवा. अशा पद्धतीने घावनाला छान जाळीदार पोत येईल.
घावनावर झाकण ठेवून मंद ते मध्यम आचेवर एक-दोन मिनिटं शिजवा. गरजेनुसार दुसरी बाजूही हलकी भाजून घ्या.
गरमागरम जाळीदार घावन साजूक तूप किंवा उपवासाच्या शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा. उपवासाच्या नेहमीच्या पदार्थांपेक्षा हा प्रकार नक्कीच वेगळा आणि चविष्ट ठरेल.