जागतिक दमा दिवस २०२६ : उष्णतेच्या लाटा वाढवत आहेत दम्याचा त्रास; रुग्णांनी काय काळजी घ्यावी? 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

जागतिक दमा दिवस २०२६ : उष्णतेच्या लाटा वाढवत आहेत दम्याचा त्रास; रुग्णांनी काय काळजी घ्यावी?

जागतिक दमा दिवसानिमित्त तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, उष्णतेच्या लाटांमुळे दम्याचा त्रास वाढण्याचा धोका वाढला आहे. वाढते तापमान, प्रदूषण आणि अॅलर्जन्स यामुळे श्वसनाचा त्रास तीव्र होऊ शकतो. दम्याच्या रुग्णांनी या काळात कोणती काळजी घ्यावी, जाणून घ्या.

Krantee V. Kale

शहरांमध्ये वाढत चाललेली कडाक्याची उष्णता आता केवळ अस्वस्थता निर्माण करणारी नाही, तर गंभीर आरोग्यधोका बनत आहे. विशेषतः दम्याच्या रुग्णांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे. जागतिक दम्यादिनाच्या पार्श्वभूमीवर रुबी हॉल क्लिनिकच्या कन्सल्टंट पल्मोनोलॉजिस्ट डॉ. गीतांजली पाटील यांच्या मते, उष्णतेच्या लाटांमुळे दम्याचा त्रास वाढण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढली आहे.

उष्णतेचा श्वसनावर थेट परिणाम

तज्ज्ञांच्या मते, उष्णतेच्या लाटांदरम्यान हवेची गुणवत्ता खालावते. जमिनीच्या पातळीवरील ओझोनचे प्रमाण वाढते, तसेच धूळ, धूर आणि अॅलर्जन्स हवेत जास्त काळ राहतात. यामुळे श्वसनमार्गांमध्ये दाह निर्माण होऊन श्वास घेणे कठीण होते. उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची कमतरता वाढते, ज्यामुळे कफ घट्ट होऊन घरघर, खोकला आणि श्वास लागणे यांसारखी लक्षणे अधिक तीव्र होतात.

लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक अधिक धोक्यात

उष्णतेमुळे परागकणांचे प्रमाण वाढते आणि ते हवेत जास्त काळ टिकून राहतात. आर्द्रतेतील बदल यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होते. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यावर याचा परिणाम अधिक तीव्रपणे जाणवतो.

काय काळजी घ्यावी?

दम्याच्या रुग्णांनी उष्णतेच्या लाटांदरम्यान काही साध्या पण महत्त्वाच्या गोष्टी पाळणे आवश्यक आहे:

  • दुपारच्या उष्ण वेळेत बाहेर जाणे टाळावे

  • घरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी एअर प्युरिफायर किंवा थंडावा देणारी साधने वापरावीत

  • पुरेसे पाणी पिऊन शरीर हायड्रेट ठेवावे

  • जास्त श्रमाची कामे टाळावीत

औषधांचे नियमित सेवन महत्त्वाचे

या काळात डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा नियमित वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. इनहेलर योग्य पद्धतीने वापरणे आणि आपत्कालीन औषधे जवळ ठेवणे गरजेचे आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार आराखडा तपासून घेणेही उपयुक्त ठरते.

मास्क आणि AQI तपासणे ठेवा सवयीत

बाहेर पडताना मास्क वापरल्यास प्रदूषक आणि अॅलर्जन्सपासून काही प्रमाणात संरक्षण मिळू शकते. तसेच दररोज एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) तपासून त्यानुसार दिवसाचे नियोजन करणे सुरक्षित ठरते.

लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

छातीत जडपणा, श्वास घेण्यास त्रास, आपत्कालीन इनहेलरचा वाढलेला वापर किंवा झोपेत अडथळा येणे यांसारखी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे डॉ. गीतांजली पाटील यांनी सांगितले.

हवामानातील बदलांमुळे उष्णतेच्या लाटा पुढील काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दम्याच्या रुग्णांसाठी पूर्वतयारी करणे आता गरजेचे ठरले आहे. योग्य काळजी घेतल्यास लक्षणे नियंत्रणात ठेवता येतात आणि गंभीर झटके टाळता येऊ शकतात.

(Disclaimer : या लेखातील माहिती ही तज्ज्ञांच्या सर्वसाधारण मार्गदर्शनावर आधारित आहे. ‘नवशक्ति’ या माहितीची अचूकता किंवा परिणामकारकता याची हमी देत नाही. )

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके