छत्रपती संभाजीनगर : जंतरमंतरवर एका महिन्यापासून आंदोलन करणारे सीजेपीचे विद्यार्थी आंदोलनकर्ते होते, त्यांनी हिंसा केलेली नाही. ज्यांनी कोणी मारामारी केली ते भाजपचे गुंड होते, असा आरोप सीजेपीचे नेते अभिजीत दीपके यांनी शुक्रवारी येथे केला.
पोलिसांसोबत जे झाले ते वाईटच झाले आहे. पण दगड कोणी आणून ठेवले होते, दगडांनी भरलेला ट्रक कसा आला, हे सगळे काही भाजपच्या लोकांनी केले आहे आणि त्यांनीच पोलिसांवर दगडफेक केली आहे. आम्ही कोणत्याच हिंसेचे समर्थन करत नाही. ज्यांनी दगडफेक केली त्यांच्यावर कारवाई करू शकता, पण ज्या विद्यार्थ्यांनी काहीच केले नाही त्यांना का त्रास दिला जात आहे, असा सवाल दिपके यांनी उपस्थित केला आहे.
पोलीस कोणाच्या इशाऱ्यानुसार शांत
अभिजित दिपके म्हणाले, विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्यात आली, बिहारमध्ये एके-४७ चालवण्यात आली. ज्या लोकांनी दगडफेक केली त्यांना अटक करा. भाजपच्या गुंडांनी येऊन १५ दिवसांपूर्वी निशू नावाची मुलगी आहे तिच्या वडिलांचे डोके फोडले, याच पोलिसांनी त्यांना अटक केली नाही. जेव्हा मी त्यांना विचारले की त्यांना अटक का करत नाही, त्यावर त्यांनी सांगितले की आम्ही असेच कोणालाही अटक करू शकत नाही, त्यानंतर या गुंडांनी व्हिडिओ बनवला, अभी तो एक को मारा हें, शाम को आऊंगा तो और मारुंगा, असे त्यांनी त्यात म्हटले होते. तेव्हा पोलीस गप्प होते. कोणाच्या इशाऱ्यावर पोलीस तेव्हा शांत होते, असा संतप्त सवाल दिपके यांनी केला आहे.