मुंबई : बकरी ईदनिमित्त गोहत्या किंवा गोमांसाची अवैध विक्री करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर 'महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा' मकोका अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
धार्मिक उत्सव आणि सण हे खासगी जागेतच साजरे केले पाहिजेत असे नमूद करून ते म्हणाले की, उत्सवाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांची कत्तल करण्यास किंवा कायद्याचे उल्लंघन करण्यास सक्त मनाई केली आहे. मंत्र्यांनी पुढे सांगितले की, उत्सवाच्या काळात अवैध कत्तल रोखण्यासाठी आणि प्राणी संरक्षण कायद्यांचे उल्लंघन टाळण्यासाठी प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी केली जाईल.
अन्सारींचे आवाहन
दरम्यान, बाबरी मशीद जमीन, विवाद खटल्यातील माजी पक्षकार आणि स्थानिक नेते इक्बाल अन्सारी यांनी मुस्लिम समाजाला बकरीद दरम्यान गायीची कुर्बानी न देण्याचे आवाहन केले आहे. अन्सारी यांनी सरकारला गायीला भारताचा 'राष्ट्रीय प्राणी' आणि 'राष्ट्रीय वारसा' म्हणून घोषित करण्याची औपचारिक विनंतीही केली आहे. त्यांच्या मते, गायीला कायदेशीर घटनात्मक दर्जा मिळाल्यास गोवंश हत्येशी संबंधित हिंसक घटना आणि जमावाकडून होणाऱ्या मारहाणीच्या (मॉब लिंचिंग) प्रकरणांना पूर्णपणे लगाम बसेल.