पुणे : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असून, या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असतानाच काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीत बुधवारी ६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नुकताच दिल्ली दौरा केला असला तरी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांनी संपर्क साधला नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच पार्थ पवार यांच्या काही वक्तव्यांमुळे काँग्रेस नाराज झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे काँग्रेसने उमेदवारी मागे न घेण्याची भूमिका घेतल्याचे समजते आणि सुनेत्रा पवार यांना प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आकाश मोरे यांनी स्पष्ट केले की, त्यांची उमेदवारी मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित झाली असून ते पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत.पक्षाने ‘चला’ म्हटले तर चालणार आणि ‘थांबा’ म्हटले तर थांबणार,असे सांगत त्यांनी अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचाच असेल, असे नमूद केले. बारामतीत विकासाचे मोठे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात सामान्य नागरिक अनेक समस्यांना सामोरे जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
बारामती पोटनिवडणुकीत आतापर्यंत विलास बाबुराव होळकर, माऊली जमादार कांबळे, रजाक ऊर्फ अब्दुलरोज जाफर मुलाणी, राहुल बाळासो थोरात, अमोल यशवंत कोकरे, अशोक रामचंद्र खामगळ या ६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.
४७ उमेदवार अद्याप रिंगणात
बारामती पोटनिवडणुकीसाठी एकूण ५३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी ६ जणांनी माघार घेतल्याने सध्या ४७ उमेदवार रिंगणात आहेत. आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने आणखी काही उमेदवार माघार घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बिनविरोध निवडणूक’ आणि ‘राजकीय संस्कृती’च्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधताना मोरे म्हणाले,सोयीचे शास्त्र आणि सवडीचा परमार्थ” हेच भाजपचे धोरण असल्याचे दिसते. लोकशाहीत वारसाहक्काने मालमत्ता मिळू शकते; पण लोकप्रतिनिधी होण्यासाठी जनतेच्या मतांची आवश्यकता असते. बारामतीतील बहुजन समाजाचे प्रश्न, महागाई, गॅस टंचाई, लोडशेडिंग, शेतीमालाला मिळणारा कमी भाव आणि सर्वसामान्यांसाठी घरांची अनुपलब्धता हे मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर जात आहे.आकाश मोरे, कॉंग्रेस उमेदवार