माजलगाव : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात गोदावरी नदीच्या पात्रात भाविकांनी भरलेली एक बोट उलटल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दोन महिला भाविकांचा बुडून मृत्यू झाला असून एका वृद्ध महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना बोटीत बसवल्यामुळे हा अपघात झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
माजलगाव तालुक्यापासून साधारण २० किमी अंतरावर असलेल्या पुरुषोत्तमपुरी येथील भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी हे भाविक जात होते. सध्या पवित्र 'अधिक मास' सुरू असल्याने या ठिकाणी दर्शनासाठी आणि गोदावरी स्नानासाठी महाराष्ट्रभरातून तसेच देशभरातून लाखो भाविकांची गर्दी होत आहे. नदी ओलांडून पलीकडच्या काठावर असलेल्या मंदिरात जाण्यासाठी भाविक बोटीचा वापर करतात. बुधवारी सकाळीही नदीकाठी प्रचंड गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेऊन स्थानिक बोट चालकांनी अधिक नफा कमवण्यासाठी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बोट चालकाने बोटीच्या वास्तविक क्षमतेपेक्षा कित्येक पटीने जास्त प्रवाशांना बोटीत कोंबले होते. ही ओव्हरलोड झालेली बोट गोदावरीच्या भर पात्रात पोहोचली, तेव्हा वजनाचा समतोल बिघडल्याने बोट उलटली. यामुळे बोटीतील पुरुष, महिला आणि लहान मुले खोल पाण्यात फेकले गेले. भाविकांचा आक्रोश ऐकून नदीकाठच्या स्थानिक मच्छीमार आणि तरुणांनी तात्काळ गोदावरी पात्रात उड्या घेतल्या आणि भाविकांना सुखरूप बाहेर काढले.
मृत आणि जखमींची माहिती
या अपघातात प्रणीला शेषराव राठोड (वय ५५ वर्ष, रा. लोणार, जि. बुलढाणा) नावाच्या महिलेचा बुडून मृत्यू झाला. तर काही वेळातच दुसऱ्या एका अज्ञात महिला भाविकाचा मृतदेह देखील पाण्यातून बाहेर काढण्यात आला. याशिवाय, सिंधुबाई अर्जुन मावळे (वय ७५ वर्ष, रा. महागाव, जि. वाशीम) या वृद्ध महिलेला बेशुद्ध अवस्थेत पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून, त्यांना माजलगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.