महाराष्ट्र

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी

मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. या दुर्घटनेप्रकरणी अटक केलेल्या चेतन पाटील याला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला.

Swapnil S

मुंबई : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. या दुर्घटनेप्रकरणी अटक केलेल्या चेतन पाटील याला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या एकलपीठाने चेतन पाटील याला २५ हजारांचा जामीन मंजूर केला, तर या प्रकरणातील प्रमुख आरोपी, शिल्पकार जयदीप आपटे याच्या जामीन अर्जाची सुनावणी सोमवारी निश्चित करण्यात आली आहे.

राजकोट किल्ला परिसरात उभारलेला शिवपुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळला. या घटनेने पुतळा उभारणीचे निकृष्ट काम उघड झाल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटेला ४ सप्टेंबर रोजी कल्याणमधून अटक करण्यात आली. सहआरोपी चेतन पाटील याला ३० ऑगस्ट रोजी अटक केली होती. या दोघांचा सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अ‍ॅड. निरंजन मुंदरगी आणि अ‍ॅड. गणेश सोवनी यांच्यामार्फत त्यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली.

दरम्यान, पोलिसांनी दोघांविरोधात आरोपपत्र दाखल केल्याने त्यांनी कनिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची भूमिका घेतली होती. मात्र, न्यायालयाने राज्य सरकारला आरोपपत्राची प्रत सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी निश्‍चित केली होती. त्यानुसार चेतन पाटील याच्या अर्जावर गुरुवारी न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्यासमोर सुनावणी झाली.

यावेळी ॲड. निरंजन मुंदरगी यांनी पुतळा कोसळून कोणत्याही व्यक्तीला शारीरिक दुखापत झालेली नाही. एफआयआरमध्ये तसा कुठे आरोप नाही. जोरदार वाऱ्यांमुळेच पुतळा कोसळला, तसेच पाटील यांनी केवळ पुतळ्याच्या पायाचा स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी अहवाल सादर केला होता. तो आजही भक्कम आहे. तसेच आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्यांच्याविरोधात कोणतेही गंभीर आरोप नसल्याने जामीन मंजूर करावा, अशी विनंती केली.

वैयक्तिक जातमुचलक्याच्या हमीवर जामीन मंजूर

न्यायालयाने याची दखल घेत चेतन पाटील याला वैयक्तिक जातमुचलक्याच्या हमीवर जामीन मंजूर केला. यावेळी ॲॅड. मुंदरगी यांनी हमीदाराची प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब होणार असल्याने पाटील याची तातडीने सुटका व्हावी, म्हणून २५ हजारांच्या रोख रकमेवर सुटका करावी, अशी विनंती केली. ती न्यायालयाने मान्य केली, तर मुख्य आरोपी जयदीप आपटे यांच्या जामीन अर्जाची सुनावणी २५ नोव्हेंबरला होणार आहे.

महाराष्ट्र जनविश्वास अध्यादेश : किरकोळ अपराधासाठी आता फक्त दंड, तुरुंगवास नाही; ७ कायद्यांतील छोटे गुन्हे 'डिक्रिमिनलाइज'

Navi Mumbai : वन खात्याच्या बोटचेप्या धोरणाचा फटका महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना; आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटीसह अनेकांवर परिणाम

तिरुमला तिरुपती देवस्थानास वांद्रे येथील जमीन; ३० वर्षांसाठी नाममात्र १ रुपया भाडे; ३९५ चौ.मी जमिनीवर पार्किंग, कार्यालय

Mumbai : बिग बींची स्मार्ट गुंतवणूक! अमिताभ बच्चन यांनी विकले गोरेगावमधील दोन आलिशान फ्लॅट्स; १३ वर्षांत तब्बल ३.८ कोटींचा नफा

'पान मसाला' जाहिरातीवरून सलमान खानला नोटीस; भाजप नेत्याने दाखल केली तक्रार