मुंबई/पुणे : मुंबईकरांना सध्या पहाटे थंड वातावरण आणि दुपारी उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सध्या हीच स्थिती आहे. कमाल तसेच किमान तापमान वाढल्याने पहाटे गारठा आणि दुपारी उकाडा अशी विषम स्थिती अनुभवायला मिळत आहे. रविवार, सोमवार आणि मंगळवारी कमाल तापमान ३४ अंशांच्या पलीकडे गेल्यामुळे दुपारी उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत.
राज्यातील अनेक भागात उच्चांकी तापमान ३६ अंशांच्या पुढे गेले आहे. रात्री आणि पहाटेच्या वेळेस गारठा वाढत आहे. मुंबईत किमान तापमान २० अंशाच्या खाली असून आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये हेच तापमान १६ ते १८ अंश सेल्सियस इतके आहे.
बदलत्या वाऱ्यांच्या प्रणालीमुळे उत्तरेतील थंड वारे, फक्त उत्तर आणि उत्तर-वायव्य महाराष्ट्रापर्यंतच पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पहाटे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पहाटेचे तापमान घसरू शकते. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई शहर व उपनगरात पुढील ४८ तास कमाल व किमान तापमान ३५ व १९ अंश राहणार आहे. तर आकाश निरभ्र राहील. यंदाचा फेब्रुवारी महिना अतिशय उष्ण राहणार, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.