@RealBacchuKadu/X
महाराष्ट्र

राज्यात तिसरी आघाडी! पुण्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ची घोषणा; छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी, बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय

छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी, बच्चू कडू, शंकरअण्णा धोंडगे, वामनराव चटप, नारायण अंकुशे यांनी व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ‘परिवर्तन महाशक्ती’ या तिसऱ्या आघाडीची घोषणा केली.

Swapnil S

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकारणामध्ये नवीन सक्षम आणि सुसंस्कृत पर्याय देण्यासाठी समविचारी नेत्यांनी एकत्र येत ‘परिवर्तन महाशक्ती’ची घोषणा पुण्यामध्ये केली. छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी, बच्चू कडू, शंकरअण्णा धोंडगे, वामनराव चटप, नारायण अंकुशे यांनी व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ‘परिवर्तन महाशक्ती’ या तिसऱ्या आघाडीची घोषणा केली.

राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय देण्यासाठी गुरुवारी पुण्यामध्ये तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्नशील असलेल्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, ‘प्रहार’चे बच्चू कडू, शंकरअण्णा धोंडगे, वामनराव चटप, नारायण अंकुशे आदी नेते उपस्थित होते. यावेळी ‘स्वराज्य’ पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, अंकुश कदम, माधव देवसरकर यांच्यासह सर्व पक्षांचे प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

महायुतीला सोडचिठ्ठी दिल्याचे स्टॅम्पपेपरवर लिहून देऊ का? - कडू

मी महायुतीतून बाहेर पडलो हे स्टॅम्पपेपरवर लिहून देऊ का? असा सवाल ‘प्रहार’चे बच्चू कडू यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात केला. लोकसभा निवडणुकीतही बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये उमेदवार देत बंडाळी केली होती. ‘परिवर्तन महाशक्ती’च्या चिन्हाबाबत लवकरच कळवू. मात्र, जे धार्मिक कट्टरवादी आहेत त्यांना सोबत घेणे आम्हाला जमणार नाही, असे त्यांनी नमूद केले.

‘परिवर्तन महाशक्ती’मध्ये सामुदायिक नेतृत्व - राजू शेट्टी

‘परिवर्तन महाशक्ती’मध्ये सामुदायिक नेतृत्व असेल. यासाठी समन्वय समिती करण्यात येईल, ही समिती सर्व निर्णय घेईल. २६ सप्टेंबरपर्यंत ज्यांना ‘परिवर्तन महाशक्ती’मध्ये यायचे आहे त्यांनी यावे, असे आवाहन त्यांनी केले. सामान्य माणसाला पर्याय म्हणून काम करू. स्वच्छ चरित्र, स्वच्छ चेहरा देण्याचा आमचा कटाक्ष राहील, असे राजू शेट्टी म्हणाले.

‘महाराष्ट्र राष्ट्र समिती’चे शंकरअण्णा धोंडगे म्हणाले की, 'महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा लक्षात घेता प्रस्थापित आघाड्यांना एक आश्वासक पर्याय देण्याचा निर्णय व निश्चय आजच्या बैठकीत झाला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही अत्यंत चांगले काम करून दाखवू.’

‘स्वतंत्र भारत’ पक्षाचे वामनराव चटप म्हणाले, ‘येत्या २६ सप्टेंबर रोजी ‘परिवर्तन महाशक्ती’च्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एकत्रित मेळावा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच ‘परिवर्तन महाशक्ती’मध्ये विविध विषयांवर निर्णय घेण्यासाठी सुकाणू समिती स्थापन करण्यात येणार आहे.’

सक्षम, सुसंस्कृत पर्याय देण्याचा प्रयत्न - छत्रपती संभाजीराजे

‘स्वराज्य’ पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, 'महाराष्ट्रातील जनता अस्वस्थ झालेली असून त्यांना सक्षम व सुसंस्कृत पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्यातील सध्याचे राजकारण पाहता, पूर्वी मोठ्या गावांना बुद्रुक व छोट्या गावांना खुर्द म्हटले जायचे, तशीच शिवसेना व राष्ट्रवादीची अवस्था झालेली आहे. महायुती किंवा मविआ यांच्या नावावर कोणाचा सातबारा आहे का? अशी विचारणा त्यांनी केली.

प्रकाश आंबेडकर, जरांगेंना सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू

ज्योती मेटे यांच्यासोबत बोलणे झाले आहे. त्यासुद्धा सकारात्मक आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा झाली असून ते सुद्धा सोबत येतील. मनोज जरांगे यांनीही सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांची भेट झाली आहे, राजकीय चर्चाही झाली आहे. आपण एक उद्दिष्ट घेऊन लढू, आम्ही एकत्रित आलो तर सगळ्यांना निवडून आणू शकतो, असे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video