मुंबई : निवडणुकीत भाषणात काही गोष्टी बोलल्या जातात. मात्र, त्याचा अर्थ असा नाही की आम्हाला राज्याचा विकास करायचा नाही. अजित पवार भाषणात बोलले पण त्यांचा तसा उद्देश नव्हता, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाठराखण केली. महायुतीत तीन पक्ष असून आगामी निवडणुकीत तिन्ही पक्षांना जनता निवडून देईल, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
नागपूर येथील कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘मतदान केले नाही तर निधी मिळणार नाही’, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात केले होते. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर महायुतीवर टीका करण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली. अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निवडणुकीत अशी वक्तव्ये केली जातात. याचा अर्थ असा नाही की, निधी मिळणारच नाही. अजित पवार जे बोलले त्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे, असे सांगत फडणवीस यांनी सारवासारव केली.
दरम्यान, स्थानिक पातळीवरील निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र लढत असून काही ठिकाणी वेगळे लढत असलो तरी जनता महायुतीला मतदान करणार आहे. त्यानंतर राज्याचा झपाट्याने विकास करण्याचे काम महायुती करेल, असेही ते म्हणाले.