जळगाव : जळगावात जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात पोटच्या चार पोरांना विहिरीत फेकून बापानेही जीवनयात्रा संपवली आहे. जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात असलेल्या एका शेतातील विहिरीत पाच मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
जामोद तालुक्यातील भाले अंजन गावातील विजय मुसा किराडिया याने आपली मुले प्रित किराडिया, प्राची किराडिया, पूर्वी किराडिया आणि पियुष किराडिया या चार मुलांसह आत्महत्या केली आहे. राजुरा धरण परिसरातील विहिरीत आधी मुलांना ढकलून नंतर स्वतः आत्महत्या केली आहे. विजय किराडिया यांनी गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांनी गळफासाकरिता लावलेली दोरी तुटली आणि ते थेट विहिरीत कोसळले.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीची पत्नी काल घरगुती वादातून माहेरी निघून गेली होती. आज सकाळी हा व्यक्ती घरातील घरकाम करत असताना या व्यक्तीला त्याच्या वडिलांनी ‘तू स्वतः काम का करतो तुझी बायको कुठे गेली..?’ असं विचारलं असता घरगुती भांडणातून विजय किराडीया याने आपल्या चारही मुलांना विहिरीत ढकलून स्वतःही आत्महत्या केली.