कोरोनाची चौथी लाट आली नाही आली असे एकीकडे चालू असताना रोज आढळणाऱ्या रुग्ण संख्येत दुपटीने वाढ होत आहे. झपाट्याने वाढत जाणाऱ्या रुग्ण संख्येवर आरोग्य विभागाचे लक्ष असून लोकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. बीए ४ , बीए ५ हा नवीन व्हेरिएंट ओमायक्राॅनचाचं असून झपाट्याने पसरणारा आहे. मात्र पुढील काही दिवस रुग्ण संख्या वाढीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. रुग्ण संख्येत अशीच झपाट्याने वाढ होत गेली तर मात्र निर्बंध लावण्याची गरज पडू शकते. सध्या तरी लाॅकडाऊन करणे, निर्बंध लावण्याची गरज नाही. मात्र रुग्ण संख्येत अशीच वाढ होत गेली तर राज्य सरकारला निर्बंध लावण्याबाबत विचार करावा लागेल, असा स्पष्ट इशारा टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ सुहास प्रभू यांनी दैनिक 'नवशक्ति'शी बोलताना दिला आहे.
दरम्यान, चौथ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क सक्ती करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. दरम्यान, वयस्कर, सहव्याधी असलेल्यांना चौथ्या लाटेचा अधिक धोका असल्याचे डॉ. प्रभू यांनी सांगितले. डिसेंबर २०२१ मध्ये कोरोनाची तिसरी लाट उसळली होती. त्यावेळी रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत होती. दिवसाला दुपटीने रुग्ण संख्येत वाढ होत होती. रुग्ण संख्येत तीन ते चार हजारांनी वाढ होत होती. चौथ्या लाटेत रुग्ण संख्येत दुपटीने वाढ सुरु आहे. त्यामुळे मास्क सक्ती करणे गरजेचे असून रेल्वे, बसेस यांसह सार्वजनिक ठिकाणी ही मास्क सक्ती केली पाहिजे, असे सल्ला राज्य सरकारला देणार असल्याचे प्रभू यांनी सांगितले.