मुंबई : शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज देण्याची योजना पुढील पाच वर्षे चालू ठेवण्याचा सरकारचा निर्धार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा करण्यासोबतच मोफत वीज देण्यासाठी होणाऱ्या खर्चाची भरपाई होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. कमी काळात योजनेची अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांनी ऊर्जा विभागाचे अभिनंदन केले.
फडणवीस यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना दिवसा अखंडित थ्री फेज वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या योजनेचे काम सुरू केले आहे. त्या अंतर्गत एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर ही शेतकऱ्यांना वीज देणारी देशातील पहिली कंपनी स्थापन केली आहे. १६ हजार मेगावॅट क्षमतेचे वीजनिर्मितीचे सौरऊर्जा प्रकल्पांचे काम सुरू केले.