महाराष्ट्र

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या ३६ तासांमध्ये पावसाचा जोर कायम असून, अजूनही पाऊस सुरू आहे.

Swapnil S

नांदेड : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या ३६ तासांमध्ये पावसाचा जोर कायम असून, अजूनही पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील २६ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून, जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे. नदी नाले ओसंडून वाहत असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमध्ये १२ जनावरे मृत्युमुखी पडली असून, २१ घरांची अंशतः पडझड झाली आहे.

आपत्ती व्यवस्थापन, कृषी, पाटबंधारे, महसूल व पोलीस विभाग स्थितीवर लक्ष ठेवून असून ज्या ठिकाणी मदतीची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी आवश्यक साधन सामुग्रीसह सतर्क राहण्याची सूचना बचावपथकांना केली आहे. एनडीआरएफचे पथक तैनातअसून कोणत्याही आपत्कालीन स्थितीमध्ये नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान महसूल विभागाच्या सतर्कतेने मुदखेड तालुक्यात पुलाव अडकलेल्या नागरिकाची सुटका करण्यात आली आहे.

शनिवारी सकाळी दहा वाजता पासून रविवारी रात्री ७ वाजेपर्यंत पावसाची कुठे दमदार अतिवृष्टी तर कुठे रिपरिप सुरू आहे. सकाळी १० पर्यंत आलेल्या आकडेवारी नुसार जिल्ह्यातील ६३ मंडळांपैकी २६ मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. किनवट सारख्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला. रात्री उशिराही पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी, नाल्यांच्या पाणीपात्रामध्ये वाढ झाली असून नागरिकांनी धोक्याच्या ठिकाणी जाणे टाळावे, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा पाऊस थांबल्यानंतर करण्यात यावा, असे निर्देश प्रशासनाने दिले आहे. प्राथमिक अंदाजानुसार व आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात झालेल्या अतिवृष्टीमध्ये सहा मोठी दुधाळ जनावरे, पाच छोटी दुधाळ जनावरे एक बैल मृत्युमुखी पडले आहे तर २१ घरांची अंशतः पडझड झाली आहे.

किनवट तालुक्यात सर्वाधिक पाऊस

जिल्ह्यामध्ये २४ तासांत सर्वाधिक पाऊस किनवट तालुक्यात झाला आहे. दहा वाजेपर्यंत १३६ मिमी पाऊस तालुक्यात झाला. तालुक्याच्या सिंदगी, उमरी बाजार व किनवट या मंडळात पावसाचा जोर अधिक आहे. किनवटपाठोपाठ हिमायतनगर, माहूर, हदगाव, भोकर, अर्धापूर, मुदखेड, या तालुक्यांमध्ये सध्या पाऊस जोरदार सुरू आहे. नागरिकांनी नाले, ओढे, तलावाच्या भागात जाण्याचे टाळावे असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील अंतर्गत वाहणाऱ्या सर्व नद्या तुडुंब वाहत असून, नागरिकांनी आवश्यकता नसेल तर पुलावरून पाणी असल्यास पूल ओलांडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

विष्णुपुरी धरणाचे आणखी काही दारे उघडली जाऊ शकतात. त्या खालच्या आमदुरा धरणाचे १६ पैकी ११ दरवाजे उघडण्यात आले आहे. त्या खालील बडेगाव धरणाचेही नऊ दरवाजे उघडण्यात आले आहे. या महिन्यात धरणामध्ये ठेवायचा जलसाठा हे लक्षात घेऊन प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात येतात. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास अधिक अतिवृष्टी झाल्यास अधिक प्रमाणात पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे या सर्व प्रकल्पाच्या खालील बाजूस असणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या