जळगाव : सेल्फी काढण्याचा मोह अनेकदा जीवावर बेतत असल्याच्या घटना सातत्याने घडत असतानाच जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे अशीच एक हृदयद्रावक घटना घडली. सेल्फी काढताना पाय घसरल्याने एकमेकांना वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन मित्रांचा ३० फूट खोल पाण्याने भरलेल्या खदानीत बुडून मृत्यू झाला.
मंगळवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास मानव रतनानी (१४), कार्तिक उधवानी (१४) आणि दिनेश पंजवानी (१७) हे तिघे मित्र अमळनेर येथील चोपडा रस्त्यावरील पाण्याने भरलेल्या खदानीत फिरण्यासाठी गेले होते. खदानीतील पाण्याच्या मध्यभागी सेल्फी काढत असताना एका मुलाचा अचानक पाय घसरला आणि तो पाण्यात पडू लागला. त्याला वाचविण्यासाठी दुसऱ्या मित्राने त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिसऱ्या मित्राने दोघांना सावरण्याचा प्रयत्न केला; परंतु तिघांचाही समतोल बिघडल्याने ते ३० फूट खोल पाण्यात कोसळले आणि बुडाले.