दीपक भिसे/ जव्हार
पालघर जिल्ह्यातील निसर्गसंपन्न आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला जव्हार तालुका पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांचा हॉटस्पॉट ठरत आहे. पावसाळ्यात मुसळधार पावसाच्या सरी, अंगावर रोमांच उभे करणारा थंडगार वारा, आणि नजरेला विसावणारी हिरवीगार डोंगरदरी हे सारे अनुभवायला पर्यटक जव्हारकडे आकर्षित होत आहेत.
मुंबई, ठाणे, नाशिक, डहाणू, पालघर, बोईसर आणि अगदी गुजरातच्या सीमेपासून जवळ असलेल्या जव्हारमध्ये या काळात निसर्गाच्या सान्निध्यात भिजण्याचा अनोखा अनुभव मिळतो. विशेषतः येथील धबधबे हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनले आहे. धबधब्यांमधून कोसळणारे शुभ्र फेसाळ पाणी आणि आजूबाजूची धुक्याची चादर हे दृश्य मन मोहून टाकते.
सोयीसुविधा विकसित
सध्या जव्हार तालुक्यात पर्यटकांसाठी आवश्यक सोयीसुविधा विकसित होत असून, धबधब्यांच्या ठिकाणी जवळच गरम जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्यामुळे भिजल्यानंतर गरमागरम जेवणाचा अनुभव अधिक सुखावह ठरत आहे.
पावसाळी सहलीसाठी निसर्गरम्य ठिकाणांची निवड करताना जव्हार हे ठिकाण पर्यटकांच्या यादीत अग्रस्थानी असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. धबधब्याच्या ठिकाणी सुरक्षिततेची खबरदारी आवश्यक! तसेच स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सुरक्षिततेच्या नियमांचे पालन पर्यटकांनी करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
दाभोसा धबधबा - निसर्गप्रेमींचे मुख्य आकर्षण
जव्हारपासून १७ किमी अंतरावर असलेला दाभोसा धबधबा सध्या सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ बनले आहे. ठाणे, गुजरात, नाशिक, सेलवास, वाडा, विक्रमगड यांसारख्या ठिकाणांहून पर्यटक येथे गर्दी करत आहेत. विशेषतः शनिवार-रविवारी येथे पर्यटकांची झुंबड उडते.