मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा ज्यांच्याबरोबर केली ते दुर्दैवाने आज आपल्यात नाहीत. त्यामुळे आता विलीनीकरणाची कोणतीही चर्चा सुरू नाही किंवा विलीनीकरण होण्याचा प्रश्नच नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी बुधवारी विधानभवन परिसरात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले.
काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून विलीनीकरणाचा मुद्दा पुढे करून राष्ट्रवादीला राज्यसभेची उमेदवारी देण्यास असलेला विरोध लक्षात घेऊन विलीनीकरणाचा मुद्दा आता संपला आहे. तसेच आम्ही महाविकास आघाडीचाच घटक आहोत, असे पाटील यांनी सांगितले.
दोन राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची शक्यता आता राहिलेली नाही. ही कल्पना अजित पवारांची होती. त्यांच्या निधनानंतर त्या चर्चा पूर्णपणे थांबल्या असून भविष्यात त्या पुन्हा सुरू होतील, असे वाटत नाही. विलीनीकरणाची चर्चा अजित पवारांच्या आग्रहानेच सुरू झाली होती. पण दोन्ही बाजूकडील भावना काय आहेत हे समजून घेणारा नेताच राहिला नसल्याने विलीनीकरणाची चर्चा आता पूर्णपणे थांबलेली आहे. त्यामुळे पुढेही विलीनीकरण होण्याची शक्यता नाही, असेही पाटील यांनी सांगितले.
शरद पवार दिल्लीत असणे महत्त्वाचे!
विलीनीकरणाची भीती असल्याने काँग्रेस आणि ठाकरे गट राज्यसभेची उमेदवारी शरद पवार गटाला द्यायला तयार नसल्याची चर्चा होती. त्याबाबत विचारले असता जयंत पाटील म्हणाले की, कुणी विरोध केला आहे असे वाटत नाही. मात्र, विलीनीकरणाचा मुद्दा आता संपला आहे. त्यामुळे दोन्ही मित्रपक्षांना याबाबत काही शंका आहे असे वाटत नाही. महाविकास आघाडी एकत्र असेल तर विधानपरिषद निवडणुकीतही अडचणी येणार नाही. तसेच आमच्या पक्षासाठी शरद पवार दिल्लीत असणे महत्त्वाचे असल्याने त्यांनी राज्यसभेवर जावे, असा आग्रह आम्ही धरल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.