लातूर : नीट पेपरफुटीमुळे बदनाम झालेल्या लातूर शहरातून शेकडो विद्यार्थ्यांनी नीट फेरपरीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुप्रसिद्ध लातूर पॅटर्नवरील शंकेचे सावट काहीसे दूर झाले आहे.
यंदाच्या निकालानंतर एकट्या राजर्षी शाहू महाविद्यालयातूनच तब्बल साडेचारशेहून अधिक विद्यार्थ्यांना एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संपूर्ण लातूर पॅटर्नचा विचार केला, तर राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये लातूरचे १२०० ते दीड हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवेश मिळवतील, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे, तर खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यापेक्षाही कितीतरी पटीने अधिक असण्याची शक्यता आहे.
उर्वरित ८०० विद्यार्थ्यांच्या निकालाचे विश्लेषण अद्याप प्रक्रियेत असून, त्यानंतर ६०० पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणखी मोठ्या प्रमाणावर वाढेल, असा विश्वास महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केला आहे. याशिवाय ५३० पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २०० पेक्षा जास्त आहे.
देशभरात गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये लातूरचे प्राध्यापक तसेच मोटेगावकर यांच्यासारख्या नामांकित क्लासवाल्यांना अटक झाली आहे. त्यामुळे यंदा फेरपरीक्षेत लातूरच्या निकालावर परिणाम होईल अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र गुरुवारच्या निकालाने ती शंका दूर झाली आहे.
यंदाच्या नीट परीक्षेत राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद विज्ञान महाविद्यालय, रिलायन्स लातूर पॅटर्न, बसवेश्वर महाविद्यालय आणि संत तुकाराम महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय गुण मिळवले आहेत, असे सांगितले जाते.
यंदा राजर्षी शाहू महाविद्यालयातील सुमारे १४०० विद्यार्थ्यांनी नीटची फेरपरीक्षा दिली होती. त्यापैकी आतापर्यंत केवळ ६०० विद्यार्थ्यांच्या निकालाचे विश्लेषण पूर्ण झाले असून, यामध्ये तब्बल ४६ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ६०० हून अधिक गुणांचा टप्पा पार केला आहे. एकूण ७२० पैकी सहाशे किंवा अधिक गुण मिळवणाऱ्यांना सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळतो असा सर्वसाधारण अनुभव आहे.