महाराष्ट्र

lok sabha election 2024 : "ही माझी शेवटची निवडणूक, उद्धव ठाकरेंची सेना 'टायटॅनिक'प्रमाणे बुडणार" : नारायण राणे

Swapnil S

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे जवळपास दशकभरानंतर निवडणुकीच्या राजकारणात परतत आहेत. यावेळी ते महायुतीकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राणेंच्या विरोधात ठाकरे गटाकडून विनायक राऊत निवडणूक लढवित आहेत. राणे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत, या निवडणुकीत भाजपने मला रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उभे राहण्यास भाग पाडले. पण, माझी ही निवडणूक शेवटची आहे, असे म्हटले आहे. मोठ्या मताधिक्क्याने निवडून येण्याचा विश्वास व्यक्त करतानाच पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी मी ही निवडणूक लढवत असल्याचे ते म्हणाले. या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा पक्ष 'टायटॅनिक'प्रमाणे बुडेल असे भाकीतही त्यांनी वर्तवले आहे.

यानंतर कोणतीही निवडणूक लढणार नाही

राणे कोकणातून सहा वेळा विधानसभेवर गेले आहेत. राजकारणापासून दूर असल्याबाबत आणि उभे राहण्यास किती उत्सूक होता याबाबत बोलताना, 'ही लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या आग्रहा खातर लढत आहोत. पक्षाने मला ही जागा निवडून आणण्याची जबाबादारी दिली असून मी ती पार पाडणार आहे. या भागातील लोक मला विजयी करतील आणि मोदींना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनवतील. आता फक्त मतदानाच्या दिवसाची वाट बघत आहे', असे राणे म्हणाले. पुढे बोलताना, 'यानंतर मी कोणतीही निवडणूक लढणार नाही. मला आता इथेच थांबायचे आहे. गेल्या १५ वर्षापासून मी राजकारणात सक्रीय आहे. या काळात मला अनेक पदे मिळाली. आता माझी दोन्ही मुले राजकारणात आहेत. त्यामुळे मी आता माझ्या व्यवसायावर लक्ष केंद्रीय करावे, असे मला वाटते', असे राणे म्हणाले.

'उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांचे आमदार त्यांना सोडून गेले. हेच उद्धव ठाकरे त्यांच्या आमदारांचा अपमान करत होते. मग त्यांनी त्या पक्षासोबत थांबायला हवे होते का? उद्धव ठाकरेंनी हिंदूंसोबत गद्दारी केली असून त्यांनी मराठी माणसांसाठी आणि हिंदूंसाठी काय केले आहे? असे अनेक उलट सवाल राणेंनी उद्धव ठाकरेंना सहानभुती मिळणार का? या प्रश्नावरून केले.

ठाकरेंची सेना 'टायटॅनिक'प्रमाणे बुडणार

पंतप्रधान मोदींचा अवमान केल्याबद्दल उद्धव ठाकरेंवर कारवाई करू असे तुम्ही सांगितलेय? या प्रश्नावर, "उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि फडणवीसांचा अपमान करतात. जे त्यांचा अवमान करतात त्यांना सिंधुदुर्गात येण्याची परवानगी देऊ नये, त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे आम्ही पोलिसांना सांगू" असे राणे म्हणाले. या निवडणुकीत ठाकरेंच्या सेनेची कामगिरी कशी असेल, या प्रश्नावर राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंचा पक्ष हा टायटॅनिकप्रमाणे बुडणार आहे. आता त्यांच्याकडे १६ आमदार आहेत. पण, लोकसभेनंतर ते देखील निघून जातील आणि फक्त रिकामे गोदाम राहील, असे भाकीत राणेंनी वर्तवले.

अजित पवार, अशोक चव्हाण आणि छगन भुजबळ यांच्यासारख्या भ्रष्टचाराचे आरोप असलेल्या नेत्यांशी भाजपने केलेली हातमिळवणी जनता स्वीकारेल का? याबाबत विचारले असता जनतेने हे स्वीकारले आहे. जर तुमची नाळ जनतेशी जोडलेली असेल तर ते स्वीकारतात आणि तुमच्या पाठिशी उभे राहतात, असे राणेंनी सांगितले.

मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर भाजप राज्यघटना बदलणार हा आरोप विरोधका केवळ दिशाभूल करण्यासाठी करत आहेत. घटना बदलण्याबाबत मोदी कधीच बोलले नाहीत, असेह ते म्हणाले.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल