अजित पवार | संग्रहित छायाचित्र  
महाराष्ट्र

अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी? ‘वर्षा’वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा

‘वर्षा’ बंगल्यावर जी बैठक झाली त्यात अजित पवारांनी संतप्त भूमिका घेतली होती आणि तेव्हा त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचीही भाषा केली, असा दावा विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार प्रकरणी शरद पवारांनी दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पार्थ पवारांना वाचवू शकत नाहीत. थेट मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतल्याशिवाय पार्थ पवार वाचू शकत नाही. ‘वर्षा’ बंगल्यावर जी बैठक झाली त्यात अजित पवारांनी संतप्त भूमिका घेतली होती आणि तेव्हा त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचीही भाषा केली, असा दावा विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

याबाबत अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, वर्षावरील बैठकीत जे घडले त्यावर मला बोलायला वेळ मिळाला नाही. परंतु माझ्या माहितीप्रमाणे, त्यादिवशी जी बैठक झाली, त्यात अजित पवारांनी रागाने सरकारमधून बाहेर पडून बाहेरून सरकारला पाठिंबा देऊ इथपर्यंतची भूमिका घेतल्याचे आमच्या कानावर आले आहे. खरे-खोटे बाहेर येईल. अजित पवारांच्या या भूमिकेमुळे त्यांना आणि पार्थ पवारांना वाचवले जात आहे असे मला वाटते, असे ते म्हणाले.

भाजपचे षडयंत्र

पुण्यातील प्रकरणाबाबत भाजपला माहिती होती, हे सर्व उघड झाल्यानंतर अजित पवार अडचणीत येतील हा त्यांचा उद्देश होता. ही मोडस ऑपरेंडी आहे. आता अजितदादांची फाईल तयार केली आहे. भविष्यात जर अजित पवारांनी काही केले तर एक मिनिटांत पार्थ पवारांना अटक होऊ शकते. हे भाजपचे षडयंत्र आहे. त्यातूनच पार्थ पवार प्रकरण बाहेर आले, असा दावाही दानवे यांनी केला.

दरम्यान, भाजपनेच प्रकरण बाहेर काढायचे, संबंधितांनी आपले ऐकले पाहिजे अशा दृष्टीने प्रयत्न करायचे. भाजपची ‘मोडस ऑपरेंडी’ ही गुन्हेगारी स्वरुपाची आहे. एकीकडे महार वतनाची जमीन विकली जाते. कंपनीचा संचालक म्हणून पार्थ पवार याच्यावर कारवाई का होत नाही. मुद्रांक शुल्क माफ केले जाते. दुसरीकडे व्यवहार रद्द झाला सांगतात, मात्र कायद्याने व्यवहार रद्द झाला तरीही मुंद्राक शुल्क भरावेच लागेल असे अधिकारी सांगताहेत. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी जी भूमिका घेतली ती चूक आहे. भाजप पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न करतेय. लोकसभेला लढणारा माणूस बाळ नाही. एक भारताचा नागरिक आणि गुन्हेगार म्हणून त्यांना वागवले पाहिजे, अशीही मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.

दानवेंचा दावा बावनकुळे यांनी नाकारला

अजित पवारांनी सरकारबाहेर पडण्याचा व सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा इशारा दिल्याचा अंबादास दानवे यांनी केलेला दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले, हा निव्वळ खोटारडेपणा आहे. अंबादास दानवे तिथे नव्हते. मी स्वतः ‘वर्षा’ बंगल्यावर होतो. अशी कोणतीही चर्चा झाली नाही. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे वेगळाच विषय घेऊन आले होते. त्यात पुरवणी मागण्या व महायुतीचे काही विषय होते. त्यामुळे मला असे वाटते की, अशी कोणतीही चर्चा झाली नाही.

Mumbai : लोकल प्रवाशांसाठी सूचना; उद्या 'या' रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, वाचा वेळापत्रक

LPG सिलिंडर बुकिंग आता आणखी सोपं! व्हॉट्सॲप, मिस्ड कॉलपासून ॲपपर्यंत अनेक सुविधा उपलब्ध

विमान तिकिटे महागणार! Air India-IndiGo नंतर Akasa Air कडूनही इंधन अधिभार; वाचा सविस्तर

देशात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नाही; घाबरून इंधन साठवू नका, केंद्र सरकारचे नागरिकांना आवाहन

पुण्यात धक्कादायक घटना; लिफ्टच्या दरवाज्यात अडकला चिमुकलीचा हात, CCTV व्हिडिओ व्हायरल